अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई द्या; रायपूरच्या शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
सेलू जि.परभणी : सेलू् तालुक्यातील रायपूर परिसरात चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. २१ मे रोजी सांयकाळी पाचच्या सुमारास रायपूर परिसराला अचानक वादळी वारे, चक्रीवादळ, अवकाळी पावसाने झोडपले. यामुळे बर्याच ठिकाणी राहत्या घरावरील जनावरानच्या गोठ्यावरील पत्रे उडाली. शेतातील पिकांचे व उभ्या असलेल्या फळबागांचे आतोनात नुकसान झालेले आहे. शेतातील तीस-चाळीस सोलारपंपाचे मोठे नुकसान झालेले आहे. परिसरातील व शेतातील कडबा चार्यांच्या पेंढ्या इतस्ततः विखरून नुकसान झाले आहे. नुकसानाची तात्काळ स्थळ पहाणी व पंचनामे करण्यात यावेत तसेच शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर रामेश्वर गाडेकर, कल्याण गाडेकर, आसाराम गाडेकर, पंजाब गाडेकर, भगवान गाडेकर, दिलीप काकडे, माऊली राऊत, बाळासाहेब गाडेकर, माऊली हिंगे आदींच्या सह्या आहेत.