अतिक्रमणावर हातोडा : जनभावनेपुढे प्रशासनाचा नरमले; सेलूतील कॉलेजरोडची रुंदी घटविली
अधिकारी व अतिक्रमण धारकात वादावादी; प्रकरण पोलीस ठाण्यात
सेलू जि.परभणी : महाराष्ट्र नगरोत्थान योजनेतून नूतन महाविद्यालय ते लोंखडी पुलापर्यंत रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असताना अतिक्रमणातील या रस्त्यावरील काही दुकाने व घरावर नगरपालिका प्रशासनाने २७ मे रोजी हातोडा चालवला. यात तीन घरे व तीन दुकाने पाडण्यात आली. त्यामुळे नगरपालिका अधिकारी व अतिक्रमण धारकात वादावादी झाल्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. दरम्यान, पोलीस प्रशासन व पालिकेने यावर समाधानकारक तोडगा काढल्यानंतर वाद शमला. महाराष्ट्र नगरोत्थान योजनेतून शहरातील विविध रस्ते विकासासाठी ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण, दुपदरीकरण करून शहरातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे.नगरोत्थान योजनेतून शहरातील १८ रस्त्याचे कामे प्रगतीपथावर आहेत. नूतन महाविद्यालय ते भांडवले यांच्या घरापर्यंतचा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यावरील दुकाने व पक्के घरे अतिक्रमणात असल्यामुळे नगरपालिकेने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अतिक्रमणधारक संतप्त झाले. सूचना न देता थेट दुकाने आणि घरे पाडत असल्याने अतिक्रमण धारकांनी आक्रमक भूमिका घेऊन काम बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्यामुळे प्रकरण वाढले नाही. अतिक्रमण धारकांकडे घराचे मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र
व दस्तावेज असतानाही अतिक्रमण पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर अतिक्रमण धारक पोलीस ठाण्यात जमले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अजय बोरसे, मुख्याधिकारी देविदास जाधव, नगरविकास अभियंता काशिनाथ धुळगुंडे, उबेद चाऊस व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना डीपी प्लॅन नुसार रस्ता केला जात असल्याचे सांगितले. मात्र, नगरपालिकेने सर्व सोयीसुविधा देऊन दस्तावेजही मालकीचे करून दिले असतानाही अतिक्रमण काढत असल्याने अतिक्रमण धारक आक्रमक झाले होते. मात्र, डीपी प्लॅन मधील अतिक्रमण काढताना कुठल्याही प्रकारची नोटीस देण्याची आवश्यकता नाही, असे मुख्याधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले. सदरील रस्ता डीपी प्लॅननुसार २४ मीटरचा आहे. मात्र, या रस्त्यावर
नागरी वसाहत असल्यामुळे घराचे नुकसान होत असल्यामुळे १८ मीटर रस्त्याची रुंदीकरण करण्याचे हाती घेतले होते. परंतु, त्यातच अतिक्रमण धारकांचा विरोध झाल्याने १६ मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यावर तोडगा काढण्यात आला. दरम्यान, अतिक्रमणात दुकान व काही घराचे नुकसान झाल्याने महिला व नागरिकांनी एकच आक्रोश केला.