रानडुकराच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू; निपाणी टाकळी शिवारातील घटना
सेलू : तालुक्यातील निपाणी टाकळी येथे गुरूवारी दुपारी तीनच्या दरम्यान रानडुकराच्या हल्ल्यात मोतीराम रंगनाथराव गिराम या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिट जमादार ज्ञानेश्वर जानगर व शिवदास सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली. मोतीराम रंगनाथराव गिराम (वय ६५ वर्ष) रा.निपाणी टाकळी हे सहा जून रोजी दुपारी तीन वाजता गट नंबर १६४ निपाणी टाकळी येथे शेतात काम करत असतांना रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्यात मोतीराम गिराम हे मयत झाले आहेत. त्याच्या पश्चात एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. या वेळी वनविभाचे परीक्षेत्र अधिकारी ऋषी चव्हाण , वनपाल बुचाले, तलाठी बेलदार यांनी भेट दिली. मृत शेतकऱ्यास वन्यप्राणी हल्याचा लाभ शासन निर्णयानुसार मिळावा व कुटुंबास दिलासा मिळावा तसेच वन विभागाने वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.