अभिवादन : साने गुरुजींचा शोध घेतांना… – हेरंब कुलकर्णी

अभिवादन : साने गुरुजींचा शोध घेतांना… – हेरंब कुलकर्णी

——————————————————————–

११ जून पूज्य साने गुरुजी यांची पुण्यतिथी यानिमित्त…

——————————————————————–

पांडुरंग सदाशिव साने. काय संबंध आहे या माणसाशी माझा ?माझ्या जन्माआधी २१ वर्षांपूर्वी मृत्युचे चुंबन घ्यायला या जगातून तो निघून गेलेला.दडपण मानावं तर एखाद्या मोठ्या पदावरचाही हा माणूस नव्हे….तेव्हाच्या वसतिगृहाचा एक अधिक्षक.. आणखी एका विनाअनुदानित शाळेचा ४ ते ५ वर्षे शिक्षक माझी तर त्याच्या ५ पट म्हणजे चांगली २५ वर्षे नोकरी झालीय .

मग मी त्यांना का मानावं ? पण कितीही म्हटलं तरी मी गुरुजीकडे दुर्लक्ष नाही करू शकतं … टाळावे म्हटलं तरी त्या प्रसिद्ध फोटोतील गंभीर करूणामयी भावाला नाही टाळता येत .. त्यांच्या त्या करूणेने ओथंबलेल्या अहिंसक नजरेला नजर नाही देता येत…

हा माणूस माझ्यात नांगराच्या फाळासारखा रुतून बसलाय….. आत्ममग्नतेचा आनंद नाही घेवू देत… सुखासिन घेऊ देत, …तो मला सुखासीन नाहीच होऊ देत..याने लिहिलेली एक ओळही न वाचता याचा नुसता फोटो जरी बघितला तरी हलवून टाकतो ..माझ्यात एक अपराधीपणा पेरून जातो ..वंचितांविषयी मी भरीव असं काही करत नाही याची बोचणी लावून जातो

यांचे डोळे बघितले की मी मला एखाद्या हत्याकांडातला क्रूर आरोपी वाटायला लागतो.. आपण किती कठोर आहोत. कोरडेठाक आहोत हे जाणवायला लागते …त्या डोळ्यातली ही करुणा माझ्या अंत: करणात का नाही ? याने मी अस्वस्थ होतो

………..

कळायला लागलं..गुरुजी रडायचे म्हणे..रडके म्हणून त्यांची टिंगल वाचलेली आणि ऐकलेली. आणि वाचलेली. पण मी तर अलीकडे कित्येक दिवसात दिवसात रडलो नाही.नापासाविषयी अतीव कणव बाळगणारे पुण्याचे पु.ग.वैद्य यांना एकदा भेटायला गेलो. “सर, मला महाराष्ट्रातील शाळा बघायच्या आहेत तर मी काय बघू ?” क्षणाचा विलंब न लावता ते म्हणाले “तिथल्या शिक्षकांना विचार की ढसाढसा रडलात या घटनेला किती वर्षे होऊन गेले ?” आणि मलासरांचा हा प्रश्न लाखमोलाचा वाटत आला आहे. आम्ही फक्त प्रियजनांच्या मृत्युने किंवा मोठी नुकसान झाली तर नाहीतर अहंकार दुखावला अपमान झाला तरच रडतो पण इतरांच्या वेदनेने क्वचितच रडायला येते ..वंचितांच्या वेदनेने आम्ही हलत नाही .रात्री उठून स्वत:च्या लेकराच्या अंगावर शाल ढकलणारे आम्ही फुटपाथवर झोपलेल्या लेकरासाठी कळवळत नाही….साने गुरुजींना रडके म्हणताना आम्ही ठरविले तरी रडू शकत नाही…आमच्यातून ते इंद्रियच नामशेष होते आहे की काय असे वाटते ….स्वत:ची लाज वाटत राहते

पुढे मी शिक्षक झालो… शिक्षक म्हणून माझ्या जडणघडणीत साने गुरुजीचे योगदान विसरताच येत नाही..लहानपणी ‘श्यामची आई चित्रपट बघितला.या चित्रपटाने मनाच्या आतल्या गाभार्‍यात काहीतरी केलं मात्र..उलथापालथ केली… खूप भावनिक बनविलं. खूप हलवलं. रडायला शिकवलं.पुढे ’श्यामची आई’ वाचण्यात आलं .ते वाचणे अजूनही जसेच्या तसे आठवते.श्यामच्या घरावर जप्ती येण्याचा प्रसंग. वाचताना रडू आले. ते अजूनही आठवते.. सावकाराचा मुकादम जप्तीआधी घरी आलेला. इतक्या वाईट आर्थिक परिस्थितीतही आई वडील त्याच्यासाठी चांगला स्वयंपाक करतात. त्याला खुष करतात. गुरुजींचे वडील त्याला व्याकुळतेने त्याला विचारतात “मागचे कर्ज फेडायला बायकोचा दागिना विकला आता काय करू ? तेव्हा ‘कर्जासाठी आता बायको विका ‘इतक्या निर्लज्जपणे तो सावकाराचा मुकादम बोलतो.

ते वाचताना झालेल्या वेदना आणि अंत:करणाला डसलेल्या इंगळया अजूनही तशाच आठवतात.जप्तीच्या दिवशी धाकटा पुरुषोत्तम मुलं चिडवतात म्हणून शाळेतून घरी रडत आलाय. आणि नंतर त्यांच्या आईच्या मृत्युचा तो प्रसंग…हर्णे बंदरात श्याम ला परतणारी मावशी भेटते. तो आईविषयी विचारतो. मावशी आई गेल्याचे सांगते. तेव्हाचा श्यामचा तो आक्रोश पिळवटून टाकतो.. दोघेही हमसून हमसून रडतात.

“आता त्या घरात जाऊन मी काय करू ? हा श्यामचा काळीज कापत जाणारा प्रश्न …. हे वाचताना रडलेले अजूनही जसेच्या तसे आठवते.नंतर वाचन वाढत गेले..कितीतरी वेदना वाचल्या,ऐकल्या..हिटलरच्या अमानुषतेची पुस्तके वाचली पण हे दु:ख, जसच्या तसं कोर करकरीत राहिलं ..काळाने माझ्या त्या वेदनेवर माती ढकलली नाही.आईच्या मृत्यूनंतर घरी आल्यावर दाराशी मारलेली “आई ‘ही हाक काळीज कापीत जाते.

बरेच फिरलो,लिहिले.समाधान वाटेना.मग काय ? देशात,महाराष्ट्रात फिरलो.गुरुजींचा नव्याने शोध घ्यावासा वाटला.याचे कारण आज शिक्षक बदलण्यासाठी गुरुजी हे मला खूपच महत्वाचे वाटू लागले.शेवटी शिक्षक हुशार असण्याबरोबर संवेदनशील आणि उत्तरदायी असणेच जास्त महत्वाचे आहे . आज ज्या शिक्षकांचे नंबर मेडीकल इंजिनियरिंगला लागू शकले असते अशी मुले प्राथमिक शिक्षक झाली आहेत.तर दुसरीकडे लिहिता वाचता न येणार्‍या मुला मुलींची संख्या वाढते आहे. याउलट मागच्या पिढीत शिक्षक अतिशय कमी शिकलेले होते. ते इंग्रजीही शिकलेले नसत पण धोतर,कोट,टोपी घालणारे ते शिक्षक ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’ ही प्रार्थना म्हणत दिवस सुरू करत आणि हातात घड्याळ नसलेली ती माणसं रात्री मुले झोपेपर्यंत कामच करत राहत.कुटुंबासाठी गैरसोयी झेलत ते त्या खेड्यात राहत .तेव्हाची ती तळमळ ही आजच्या या हुशार मुलामध्ये कशी आणायची..? कोणी संक्रमित करायची ? पण त्याच जुन्या शिक्षकांच्या हाताखालीच मुले खर्‍या अर्थाने घडली.. हे असं का घडतयं ?ही विसंगती कशी समजून घ्यायची…?? याचे उत्तर शोधायला गुरुजींकडे जावे लागेल असे वाटायला लागलं… शिक्षक हा जितका स्वप्नाळू भाबडा आणि भावुकच तितका तो अधिक चांगला शिक्षक होण्याची शक्यता जास्त हे लक्षात येत गेले. इथे बुद्धिमत्तेइतकेच मुलांविषयी कणव वाटणे सर्वोच्च महत्वाचे आहे हे समजल्यावर साने गुरुजी हीच लस पुन्हा एकदा शिक्षक समुदायात द्यावी लागेल याची खात्री पटली…रजनिश म्हणाले होते की शिक्षण क्षेत्रातून पुरुष हटवा आणि फक्त महिलाच फक्त राहू द्या कारण हे प्रेमाचे हळुवारतेचे क्षेत्र आहे ..ओशोंना हे गुरुजीकडे बघून तर सुचले नसेल ना …?

 

( ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ या हेरंबकुलकर्णी यांच्या मनोविकास प्रकाशनच्या पुस्तकातून साभार)

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!