…हा जन्म फक्त माझा खोटा ठरू नये‌; गुरूगौरव काव्य मैफिलीने सेलूकर मंत्रमुग्ध

…हा जन्म फक्त माझा खोटा ठरू नये‌; गुरूगौरव काव्य मैफिलीने सेलूकर मंत्रमुग्ध

प्रतिनिधी, सेलू (जि.परभणी) : राज्य सरकारच्या यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक के.डी. वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी, १० जून रोजी सेलूतील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयात गुरुगौरव काव्य मैफिल आयोजिण्यात आली होती.‌ याप्रसंगी सादर काव्य रचनांनी सेलूतील रसिक मंत्रमुग्ध झाले.

अध्यक्षस्थानी कवी गौतम सूर्यवंशी होते. याप्रसंगी माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे, संतोष कुलकर्णी, रघुनाथ बागल, कॉ.अशोक उफाडे, शेख महेमुद, चंद्रशेखर मुळावेकर, निर्मिक क्लासेसचे संचालक शुकाचार्य शिंदे सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांची उपस्थिती होती. प्रारंभी कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले.

मैफिलीमध्ये कवी शुक्राचार्य शिंदे यांच्या, ‘वाटले मला की ही जात विरून गेली, भलतेच चित्र दिसते, ही जात भरून आली ‘ या कवितेने रसिकांना अंतर्मुख केले. संजय विटेकर यांच्या ‘ मी वागणार नाही खोटे इथे कधी, हा जन्म फक्त माझा खोटा ठरु नये’ या गझलेला रसिकांची दाद मिळाली. डॉ.अशोक पाठक यांच्या, ‘ हे तुला काय सांगू भल्या माणसा, हे आयुष्य आहे एकदाच माणसा, जग दिसले तुला त्या आईमुळे, ताठ मानेने चाले तू बापामुळे’ या कवितेने रसिक भारावून गेले. सुरेश हिवाळे यांच्या ‘माणसांसाठीचा लढा ‘ या कवितेने वास्तवाची जाणीव करून दिली. ‘मेंदूच्या नसानसा कुरतडतात, विविध रंगी विचारांचे उंदीर, पाड्यापाड्यावर फडकत आहेत, फक्त धर्म- जातीचेच झेंडे, दिसत नाही कोठेच, माणसांचे मंदिर, चला होऊ पुन्हा लहान मुल, सोडविण्या हा तिढा, आपल्यातील महापुरूष जागा करू, देण्या माणसांसाठी लढा.’ डॉ.शरद ठाकर यांच्या ‘काय सांगू बाई तुला, माझ्या माहेरची रित, माय बाप भावाची ती, जगा वेगळी गं प्रित ‘ या कवितेने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. प्रभू शिंदे यांच्या ‘ मायीला म्हणावं मह्या, यकदा येऊन जाय, लेक कशी हायं ते, डोळ्यानं पाहुन जाय’ या कवितेने रसिक भावनिक झाले. गौतम सूर्यवंशी, पु.ना.बारडकर, अश्विनी घोगरे, करूणा बागले, सुमिता सबनिस, सतीश शिंदे, बळीराम चव्हाण यांच्या कवितांनाही उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रा.वाघमारे यांचा माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परिचय राजेंद्र सोनवणे यांनी करून दिला. प्रास्ताविक संयोजक सुनील गायकवाड यांनी केले. भगवान पल्लेवाड यांनी मानले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, धनंजय भागवत यांनी केले. सतीश जाधव, शामराव मचाले, शंकरराव गात, शशिकांत बिहाडे, रूपेश बहुते, बाबासाहेब थोरे, महादेव आगजाळ संजय घोंगडे, पंडित जगाडे आदींसह रसिकांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!