एकात्मिक मोफत पाठ्यपुस्तक योजना : १६ हजार विद्यार्थ्यांना नवीकोरी; अनेकांना मात्र जुन्यावरच अभ्यास
बाबासाहेब हेलसकर…
सेलू जि.परभणी : राज्य सरकारच्या समग्र शिक्षा अभियान व एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यावर्षीही शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मोफत मिळणार आहेत. दरम्यान, सेलू् तालुक्यासाठी मागणीपेक्षा कमी पुस्तके उपलब्ध झाल्याने १६ हजार ९७० विद्यार्थ्यांना नवीकोरी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत, तर दरवर्षीप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांना जुन्याच पुस्तकांशी गट्टी करावी लागण्याचीही चिन्हे आहेत.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियमानुसार शिक्षण हे सक्तीचे व मोफत झाले आहे. प्रत्येक प्रवेशपात्र विद्यार्थ्याला शाळेत दाखल करून घेऊन त्यास शिक्षणाचे धडे देण्याची जबाबदारी कायद्याने सरकारवर आहे. यातूनच पात्र शाळांना सरकार मोफत शालेय पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देते. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच मागणी नोंदवल्यानुसार शाळांसाठी प्राप्त पुस्तके वाटपाचे नियोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) अंंतर्गत सेलू तालुक्यातील नऊ केंद्रांतील १७४ शाळांच्या १८ हजार ९६५ विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. यामध्ये वर्ग पहिला २११९, दुसरा २२०९, तिसरा २३६५, चौथा २१९३, पाचवा २३२०, सहावा २४८७, सातवा २६६२ व आठवा २६१० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मागणीपैकी १६ हजार ९७० विद्यार्थ्यांसाठीची पाठ्यपुस्तके सेलू येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. त्यापैकी मागणीच्या १४ हजार २२५ (७५ टक्के) विद्यार्थ्यांसाठी शाळांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप केंद्रप्रमुख व त्या-त्या शाळांना करण्याचे नियोजन करण्यात आले. यानुसार १२ जूनपर्यंत जवळपास सर्वच शाळांना वाटप झाले आहे. २ हजार ७४७ विद्यार्थी संख्येएवढी पुस्तके शिल्लक आहेत. आवशक्यतेनुसार याचेही वाटप केले जाणार आहे. अशी माहिती शिक्षण विभागाने दिली. पुस्तके वाटपासाठी गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांच्या मार्गदर्शनखाली गट साधन केंद्राचे माधव गायकवाड, मनोज देगावकर, जनार्दन कदम, एम.एम.गायकांबळे, रमेश मरेवार, सुहास नवले, दत्ता काळे आदींनी यासाठी पुढाकार घेतला.
इयत्ता पहिली ते आठवीच्या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळा आदी एकूण १७४ शाळांचा समावेश आहे. एका वर्गासाठी प्रत्येकी चार भाग आहेत. यामध्ये सर्व विषयांचा समावेश आहे. भाग एक, दोन पहिल्या सत्रासाठी, तर तीन व चार दुसऱ्या सत्रासाठी आहे. पुस्तकांमध्ये लिहिण्यासाठी पुरेशी कोरी पानेदेखील जोडलेली आहेत. त्यामुळे दप्तराचे ओझेही कमी होणार आहे. पात्र शाळांना पाठ्यपुस्तक वाटप जवळपास पूर्ण झाले आहे. – उमेश राऊत, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती. सेलू जि.परभणी
मोफत पाठ्यपुस्तकांची सरकारची योजना चांगली आहे. परंतु सरसकट सर्वांना पुरतील एवढे पुस्तके दरवर्षी सरकार का उपलब्ध करून देत नाही, हा देखील प्रश्नच आहे. या वर्षीही सेलू तालुक्यातील दोन हजारावर विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके कमी पडणार आहेत. वाट पाहण्यात अर्धे शैक्षणिक सत्र निघून जाते. त्यामुळे वाढीव नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्याआधीच शाळांनी विद्यार्थ्यांकडील गतवर्षीची जुनी पाठ्यपुस्तके नियोजनपूर्वक किमान वेळेत परत घेतली पाहिजेत. आणि शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ती लगेचच वाटप करणे आवश्यक आहे. अन्यथा नवीन पाठ्यपुस्तके खरेदीसाठी नाहक पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. – सचिन कोरडे, सतीश जाधव, पालक
शालेय साहित्यातील सर्वच प्रकारच्या लेखन वह्यांच्या किंमती १० ते २० टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत. मात्र, सर्वच इयत्तांची नवीन पाठ्यपुस्तके १० ते १५ टक्क्यांनी महागली आहेत. प्राथमिक वर्गांसाठी नवीन पाठ्यपुस्तके, वह्या व अन्य किमान शैक्षणिक साहित्यासह खरेदीचे आर्थिक बजेट ६००-१००० रूपयांपर्यंत जाऊ शकते. पुढच्या वर्षी काही इयत्तांचे अभ्यासक्रम बदलण्याची शक्यता गृहित धरून आवश्यकतेनुसारच पाठ्यपुस्तकांची मागणी केली आहे. – राजेश पौळ, नंदकिशोर पारीख, विक्रेता
पाठ्यपुस्तक संचाची किंमत
इयत्ता पहिली : २८५ रूपये
इयत्ता दुसरी : २८० रुपये
इयत्ता तिसरी : ५५४ रुपये
इयत्ता चौथी : ५५१ रुपये
इयत्ता पाचवी : ५५४ रुपये
इयत्ता सहावी : ५७६ रुपये,
इयत्ता सातवी : ५९४ रुपये
इयत्ता आठवी : ५६० रुपये
इयत्ता नववी : ७८४ रुपये,
इयत्ता दहावी : ८५४ रुपये