NEET UG-2024 : ‘नीट’ ची सीबीआय चौकशी; केंद्र, ‘एनटीए’ला नोटीस

NEET UG-2024 : ‘नीट’ ची सीबीआय चौकशी; केंद्र, ‘एनटीए’ला नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने मागितले दोन आठवड्यांत उत्तर; याचिका वर्ग करण्यासाठीही नोटीस

‘नीट’ बाबतच्या अनेक याचिकांवर वेगवेगळी सुनावणी टाळण्यासाठी अशी सर्व प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश देण्याची विनंती करणारी याचिका ‘एनटीए’ने दाखल केली आहे. त्यावर ‘नीट’च्या फेरपरीक्षेसाठी, वाढीव गुण रद्द करण्यासाठी आणि स्वतंत्र चौकशीसाठी विविध उच्च न्यायालयांमध्ये धाव घेणाऱ्या याचिकाकर्त्यांना शुक्रवारी नोटीस बजावून सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांचे उत्तर मागवले आहे. सर्व याचिकांवर आठ जुलैला सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी होईल, असेही खंडपीठाने सांगितले.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘नीट-यूजी २०२४’ मध्ये ( पदवीपूर्व राष्ट्रीय पात्रता सह परीक्षा) कथित प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आणि इतर गैरप्रकारांच्या आरोपांची चौकशी ‘सीबीआय’ मार्फत व्हावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या मागणीवर दोन आठवड्यांत उत्तर द्यावे, असे निर्देश देणारी नोटीस न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकार, राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए), सीबीआय आणि बिहार सरकारला बजावली. हितेनसिंह कश्यप आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी सुरू आहे. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर ८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू होणार आहे. त्या दिवशी ‘नीट’ संदर्भातील सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होईल, असे या खंडपीठाने आधीच स्पष्ट केले आहे. शुक्रवारी संक्षिप्त सुनावणीदरम्यान, एका वकिलाने सीबीआय चौकशीवर जोर देण्यासाठी युक्तिवाद म्हणून राजस्थानमधील कोटा येथे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उल्लेख केल्याने खंडपीठ चिडले.’इथे अनावश्यक भावनिक युक्तिवाद करू नका,’ असे न्या. नाथ यांनी त्या वकिलाला सुनावले. पदवीपूर्व राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेत (नीट-यूजी) प्रश्नपत्रिका फुटण्यासह इतरही गैरप्रकार झाल्याचे आरोप विद्यार्थी आणि कोचिंग सेंटर्सकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे या संदर्भात सीबीआय चौकशीची मागणी याचिकांद्वारे करण्यात आली आहे. त्यावर खंडपीठाने सांगितले, की सीबीआय चौकशीबाबत कोणताही आदेश देण्यापूर्वी ‘एनटीए’चे उत्तर आवश्यक आहे. ‘हा २४ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे,’ असा युक्तिवाद वकिलांनी केला. त्यावर खंडपीठ म्हणाले, ‘आम्ही समजू शकतो. त्या सगळ्याची जाणीव आम्हाला आहे.’ दरम्यान, या परीक्षेत १,५६३ विद्यार्थ्यांना देण्यात आलेले जादा गुण (ग्रेस मार्क) रद्द करण्यात येत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसमोर २३ जून रोजी फेरपरीक्षा देण्याचा पर्याय असेल,अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने ‘एनटीए’ने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दिली होती.

गैरप्रकार खपवून घेणार नाही : धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली : ‘कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. त्रुटी आढळल्यास ‘एनटीए’ मध्ये जबाबदारी निश्चित केली जाईल. ‘एनसीईआरटी’ च्या तर्कसंगत अभ्यासक्रमानुसार ‘नीट’चा अभ्यासक्रम कमी करण्यात आला असून, राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाशी संरेखित केलेले प्रश्न देण्यात आले होते. त्यामुळे यावेळी टॉपर्सची संख्या वाढली आहे,’ असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी सांगितले.

पंतप्रधानांचे मौन का ? : कॉंग्रेस

नवी दिल्ली : ‘नीट’च्या मुद्द्यावरून काँग्रेसने शुक्रवारीही केंद्र सरकारवर हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर मौन का आहेत, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला; तसेच केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणीही पुन्हा केली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!