सामान्य ते असामान्य : कार्यशाळेने दिली शिक्षणाची दिशा; सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद
विद्यार्थ्यामध्ये उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबरोबच सतत शिकण्याची जिद्द, प्रत्यक्ष काम करत राहण्याची वृत्ती, नेतृत्वगुण, संशोधकवृत्ती, चिकित्सात्मकता, रचनात्मकता व नवनिर्मितीच्या ध्यास आदी गुण विकसित करण्याची गरज आहे, असे मत श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी यावेळी व्यक्त केले.
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने पालक व विद्यार्थ्यांसाठी रविवारी, १७ जून रोजी सायंकाळी आयोजित आदित्यसिंग राजावत यांच्या ‘ सामान्य ते असामान्य ‘या विषयावरील मार्गदर्शन कार्यशाळेला शहर व परिसरातील विद्यार्थी, पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. साई नाट्य मंदिरात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रफुलसेठ बिनायके, श्री.राजूरकर, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य डॉ. मीनाक्षी रत्नपारखी, डॉ.बबन सोनवणे, प्रगती क्षीरसागर, शालिनी शेळके, प्रा.अशोक बोडखे, प्रा.कार्तिक रत्नाला, प्रा.अक्षय बन, कैलास ताठे, श्री.कांबळे, विठ्ठल सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजपूत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सामान्य लोक आव्हानाला घाबरतात, तर असमान्य लोक आव्हाने स्वीकारतात आणि यशस्वी होतात. पण मग, ही असामान्य लोक यशाची गुरुकिल्ली घेऊनच जन्माला येतात का? नाही? तर ते स्वतः यशाचा मार्ग तयार करतात. जसे, यश आपोआप मिळत नाही, तसे यशस्वी लोकही आपोआप घडत नाहीत. मोठ्या हुद्द्याची, मोठ्या पगाराची नोकरी मिळाली, म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असे नाही. तर, तुमची कामाची पद्धत, सहकाऱ्यांशी वागणुक, कंपनीला यशस्वी होण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत तुम्हाला यशस्वी ठरवते, असे मत आदित्यसिंग राजावत यांनी या वेळी व्यक्त केले. यशासाठी ते टिकवून ठेवावी लागते. यासाठी प्रयत्न, अभ्यास, चिकाटी आणि प्रचंड सकारात्मकता असावी लागते. या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबरोबच सतत शिकण्याची जिद्द, प्रत्यक्ष काम करत राहण्याची वृत्ती, नेतृत्वगुण, संशोधकवृत्ती, चिकित्सात्मकता, रचनात्मकता व नवनिर्मितीच्या ध्यास आदी गुण विकसित करण्याची गरज आहे, असे मत श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी यावेळी व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय ठाकर यांनी केले. कार्यक्रमासाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व घटक संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.