सेलूतील जैन मंदिरात विविध कार्यक्रम उत्साहात; व्याख्यानांना श्रोत्यांची मोठी उपस्थिती
मनुष्य जन्मात विविध दहा प्रकाराचे धर्म सांगितले आहेत. त्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. राग, मोह, द्वेष, ममत्व, आसक्ती तसेच विकारांपासून दूर राहून स्वतःचा शोध घेणे आणि चैतन्य स्वरूप आत्मा समजून त्यामध्ये लीन होऊन जाणे म्हणजेच धर्म असल्याचे पंडित टोडरमल सिद्धांत महाविद्यालयाचे प्राचार्य शांतीकुमार पाटील (जयपूर, राजस्थान) यांनी यावेळी सांगितले.
सेलू जि.परभणी : सेलू् येथील श्री नेमीनाथ दिगंबर जैन मंदिरात २१ ते २३ जून या कालावधीत आयोजित नवदेवता विधान, शास्त्री संमेलन, प्रवचन, व्याख्यानमालेसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
सुमन बबनराव विश्वंभर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजश्री व अनंतकुमार विश्वंभर आणि सकल जैन समाजाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंडित टोडरमल सिद्धांत महाविद्यालयाचे प्राचार्य शांतीकुमार पाटील (जयपूर, राजस्थान) यांची पाच व्याख्याने झाली. ‘भौतिक युग मे धर्म कब, क्यूँ और कैसे ? हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. मनुष्य जन्मात विविध दहा प्रकाराचे धर्म सांगितले आहेत. त्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. राग, मोह, द्वेष, ममत्व, आसक्ती तसेच विकारांपासून दूर राहून स्वतःचा शोध घेणे आणि चैतन्य स्वरूप आत्मा समजून त्यामध्ये लीन होऊन जाणे म्हणजेच धर्म असल्याचे प्राचार्य डॉ.पाटील यांनी यावेळी सांगितले. शनिवारी सायंकाळी सच्चिदानंद डाखोरे, शिरीषकुमार संगई व गिरीश दीक्षित संचाने भक्ती संगीत सादर केले. रविवारी अशोक जैन (उज्जैन) यांच्या नेतृत्वाखाली नवदेवता विधान विधी झाला. लघुशास्त्री संमेलनात मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील जैन शास्त्री सहभागी झाले होते. डॉ.महावीर मांगुळकर, संतोष पाटणी, रवींद्र काळे, प्रकाशचंद बिनायके, कीर्तींजय गोरे, प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, नीलेश बिनायके, दत्तराव पावडे, मधुकरराव पौळ, तुकाराम मगर, अनंतकुमार विश्वंभर, अशोक कासार,अशोककुमार वानरे आदींसह सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.