अधिवेशनात ओबीसींच्या हिताची चर्चा व्हावी – प्रा.लक्ष्मण हाके; परभणीमध्ये अभिवादन दौरा
परभणी : सगे-सोयर्याच्या अध्यादेशाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) बांधवांचा पूर्णपणे विरोध आहे. सरकारवरचा भरोसा उडाल्यामुळे आम्ही वडीगोद्री येथे दहा दिवस आंदोलन केले आणि आता जनतेत जात आहोत. मुख्यमंत्र्यांंनी आमच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही, ते सांगावे. आता सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ६० टक्के ओबीसींच्या हितासाठी चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी ओबीसींचे नेते प्रा.लक्ष्मण हाके यांंनी केली आहे.
परभणी येथील माहेर मंगल कार्यालयात गुरूवारी, २७ जून रोजी ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती परभणीच्या वतीने अभिवादन दौर्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात प्रा.हाके यांनी आपली भूमिका मांडली. याप्रसंगी नवनाथ वाघमारे व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रा.हाके म्हणाले की, ओबीसीमधील अनेक जातीसमूहांना आजही स्वातंत्र्याची फळे चाखता आलेली नाहीत. पुढच्या पिढीसाठी हक्क व अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर समाजातील सर्व घटकांनी एकत्रित आले पाहिजे.
मनोज जरांगे म्हणतात मराठा समाज मागासलेला आहे तर मग महाराष्ट्रात पुढारलेला समाज कोणता आहे हे त्यांनी सांगावे. मागील काही महिन्यात कुणबी मराठा अशा बोगस खाडाखोड करून नोंदी केल्या आहेत असा आरोप करीत त्याआधारे दिलेली प्रमाणपत्रे रद्द झाली पाहिजेत. अशी मागणी प्रा.हाके यांनी केली.ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. ओबीसी आरक्षणात कोणालाही घुसू दिले जाणार नाही असे वाघमारे म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने सकल ओबीसी समाज, कार्यकर्ते, महिला, तरुण उपस्थित होते.