श्री गजानन महाराजांच्या पालखी दर्शनासाठी परभणीमध्ये गर्दी ; आषाढीवारी दिंड्यांचे आळंदीकडे प्रस्थान
परभणी : शेगाव येथून पंढरपुरकडे मार्गस्थ झालेली श्री गजानन महाराजांच्या पालखीचे गुरुवारी, २७ जून रोजी परभणी शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. दर्शनासाठी भाविकांची गर्दी केली होती. बुधवारी, २६ जून रोजी पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा पालखीचे आगमन झाले. एरंडेश्वर, भारती कॅम्प, नांदगाव, रिहाटी मार्गे श्रीक्षेत्र त्रिधारा येथे पालखी मुक्कामी होती. यावर्षी श्रींच्या ५५ वा दिमाखदार पालखी सोहळा पंढरपुरकडे मार्गस्थ झाला आहे. ७०० वारकरी, चार अश्व, नऊ वाहने, डॉक्टर, सेवेकऱ्यांच्या मोठ्या लव्याजम्याचा सहभाग आहे.
परभणी : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पंढरपूर आषाढीवारी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परभणी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या दिंड्यांनी विविध वाहनांद्वारे आळंदीकडे प्रस्थान ठेवले आहे.
सेलू तालुक्यातील १६३ वर्षाची परंपरा लाभलेल्या वालूर येथील अण्णासाहेब महाराज वालुरकर दिंडीचे मंगळवारी, २५ जून रोजी वालूर येथून आळंदीकडे प्रस्थान झाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी सोहळ्यात माऊलींच्या रथामागे १५ क्रमांकावर वालूरकर दिंडीचा असते. २५ जून रोजी अण्णासाहेब महाराज वालूरकर यांच्या समाधीस्थळापासून ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या जयघोषात दिंडीमध्ये जिल्ह्यातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी झाले आहेत. दिंडीची परंपरा अण्णासाहेब महाराज वालूरकर यांनी सुरू केली होती. त्यानंतर त्यांचे सुपुत्र बापूसाहेब महाराज वालूरकर यांनी दिंडीची धुरा समर्थपणे सांभाळली व फडाचा विस्तार केला.आपुलकी, माया व अध्यात्म यांची सांगड घालून हजारो वारकऱ्यांना त्यांनी विठ्ठल भक्तीच्या प्रवाहात आणले. थोरले बंधू स्वातंत्र्यसैनिक बालासाहेब चौधरी व धाकटे बंधू स्वातंत्र्यसैनिक रावसाहेब चौधरी यांची त्यांना मोलाची साथ लाभली. सध्या बापूसाहेब महाराज यांचे सुपुत्र पुरुषोत्तम महाराज दिंडीचे नेतृत्व करीत आहेत.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पंढरपूर आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी हेलस (ता.मंठा) येथील दिंडीचे २६ जून रोजी प्रस्थान झाले. महिला, पुरुष, तरूण विठ्ठल भक्त सहभागी झाले आहेत. दिंडीचे ३७ वे वर्ष आहे. शिवाजीराव (आप्पा) खराबे, बन्सी महाराज खराबे, छगनराव कासार, शंकरराव कासार, उत्तमराव खराबे, साहेबराव गुरुजी, रावसाहेब खराबे, किसनराव पाटील, गणेशआप्पा बोराडे, रावसाहेब महाराज आदींच्या पुढाकाराने दिंडीची परंपरा सुरू झाली. दीपक खराबे, भारत खराबे, नारायण खराबे यांनी परंपरा सुरू ठेवली आहे. गेल्या काही वर्षांपासून मंठा येथील तुकाराम महाराज वारकरी प्रतिष्ठानचे लक्ष्मण महाराज बाहेकर नेतृत्व करीत आहेत.
१६३ वर्षाची परंपरा लाभलेल्या पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांचे जेष्ठ वद्य ७ शके १९४६, २८ जून शुक्रवाररोजी श्रीक्षेत्र आळंदी येथे माऊलींच्या मंदीरात व जेष्ठ वद्य १२ शके १९४६, ०३ जुलै बुधवाररोजी सासवड येथे माऊलींच्या पालखीसमोर मानाची कीर्तनसेवा होईल. : विजय चौधरी, वालूर
आधी राहण्याची, जेवणाची गैरसोय होती. पुढे टेण्ट, विविध साहित्य, स्टोव्ह आदी वस्तू जमत गेल्या. महिलांचा सहभाग वाढला. त्यामुळे स्वयंपाकाला मोठी मदत झाली. आता वाहनाची व्यवस्था आहे. गॅस सिलिंडर, शेगडी, शुद्ध पाण्याचे जार आदी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आनंदाच्या सोहळ्यात दरवर्षी गावकरी सहभागी होत असतात. – बन्सी महाराज खराबे, हेलस