‘गुगलगुरु’ युगातही शिक्षकांचीच भूमिका महत्त्वाची : डॉ.संजीव देशमुख यांचे मत; सेलूतील नूतन शिक्षण संस्थेतील गुणवंतांचा सत्कार

‘गुगलगुरु’ युगातही शिक्षकांचीच भूमिका महत्त्वाची : डॉ.संजीव देशमुख यांचे मत; सेलूतील नूतन शिक्षण संस्थेतील गुणवंतांचा सत्कार

सेलू जि.परभणी : स्पर्धेच्या युगात ज्ञानाच्या कक्षा गतीने रूंदावत आहेत. विद्यार्थ्यांचा शिक्षकांपेक्षा मोबाईलवर अधिक विश्वास आहे. परंतु, गुगलवर संस्कार उपलब्ध नाहीत. त्यामुळे ‘गुगलगुरू’ युगातही संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकांचीच भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांसह पालकांनी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत दिल्ली आयआयटीतील प्राध्यापक डॉ.संजीव गोविंदराव देशमुख यांनी व्यक्त केले.

'गुगलगुरु' युगातही शिक्षकांचीच भूमिका महत्त्वाची : डॉ.संजीव देशमुख यांचे मत; सेलूतील नूतन शिक्षण संस्थेतील गुणवंतांचा सत्कार
सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील गुणवंतांच्या सत्कारप्रसंगी दिल्ली आयआयटीतील प्राध्यापक डॉ.संजीव देशमुख यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ.एस.एम.लोया, डी.के.देशपांडे, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, डॉ.उत्तम राठोड आदींची उपस्थिती होती. (छायाचित्र : सदाशिव महाजन)

 

सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ८५ वा वर्धापन दिन आणि श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिनानिमित्त बुधवारी, ३ जुलै रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. याप्रसंगी उपाध्यक्ष डी.के. देशपांडे गुरुजी, सचिव प्राचार्य डॉ.विनायराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, मुख्याध्यापक संतोष पाटील, निशा पाटील, सुखानंद बेडसुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.देशमुख म्हणाले,” नूतनच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात संस्थेला अभिमान वाटावा, असे कर्तृत्व सिद्ध केले आहे. संस्थेला उज्ज्वल शैक्षणिक आणि सामाजिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे. तो जतन करण्याची जबाबदारी शिक्षक, संस्थाचालक, आजी माजी विद्यार्थी आणि सेलूकरांवरदेखील आहे. त्यातूनच आठ हजार विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध उपक्रमांद्वारे सदृढ समाज घडविण्याचे शिक्षण देणारा ‘नूतन’चा ब्रॅण्डची विकासाच्या दिशेने अविरत वाटचाल सुरू राहणार आहे.” याप्रसंगी चौथी ते पदवी, शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांचा तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल सौ.सावित्रीबाई बद्रीनारायण बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जयप्रकाश बिहाणी यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी संस्था अहवाल सादर केला. प्रास्ताविक डॉ.कोठेकर यांनी केले. यादी वाचन डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन अशोक लिंबेकर, तर संतोष पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सतीश कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, अमिता देशमुख, संस्थेचे सदस्य, आजी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षकांची उपस्थिती होती. यानिमित्ताने संस्थेतील घटक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी भरविलेल्या विज्ञान उपकरण प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी राहिलेले प्रमुख पाहुणे डॉ.संजीव देशमुख यांनी १९७५ ला दहावीच्या परीक्षेत मराठवाड्यातून व्दितीय, तर १९७७ ला बारावीच्या परीक्षेत सर्वप्रथम क्रमांक मिळविला होता. या पार्श्वभूमीवर आर्यन गाडेकर या विद्यार्थ्यांने वृत्तपत्र वितरकांच्या भूमिकेत “आजचा मराठवाडा; नूतनचा देशमुख मराठवाड्यात पहिला” या खास अंदाजात ‘दैनिक मराठवाडा’तील बातमीच्या प्रतिकात्मक प्रती वाटण्याचा प्रसंग यावेळी सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!