मराठवाडा शिक्षक संघ : 65 हजार रिक्तपदे भरा, जुनी पेन्शन योजना लागू करा; परभणीमध्ये जोरदार धरणे आंदोलन
राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा, पदाधिकाऱ्यांसह शिक्षकांची उपस्थिती
परभणी: राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न, समस्यांच्या पूर्ततेसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने गुरुवारी चार जुलैरोजी परभणी येथे जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारच्या धरसोडीच्या व नकारात्मक शैक्षणिक धोरणामुळे राज्यातील शालेय शिक्षण विभाग प्रश्नग्रस्त बनला आहे .राज्यकर्त्यांनी स्वतःसाठी अतिशय आकर्षक पेन्शन योजना लागू करून घेतलेली असताना शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास चालढकल करीत आहेत . वीस-बावीस वर्षांपासून राज्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनावेतन व अंशता वेतनावर राबवून घेतल्या जात आहे.सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता प्रलंबित आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तीन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू केली जात नाही अशी असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे अशा भावना शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी व्यक्त केल्या.
या धरणे आंदोलनाद्वारे अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील निकष पात्र विनाअनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सूत्रानुसार शंभर टक्के अनुदान देऊन शिक्षकांची वेठबिगारी संपवावी, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पाचवा हप्ता रोखीने देण्यात यावा, राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस अशा तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी,प्रलंबित चार टक्के महागाई भत्ता वाढ देण्यात यावी, राज्यात शिक्षकांची 65 हजार पदे रिक्त आहेत ती तात्काळ भरण्यात यावी, राज्यात पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व माध्यमाच्या शाळांना 100% वेतन आणि वेतनेत्तर अनुदान देण्यात यावे, शिक्षकांच्या पाल्यांना सर्व स्तरावरील मोफत शिक्षणाचा शासनादेश लागू करावा, सर्व शैक्षणिक संस्थांचे वेतन वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे…. या मागण्या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आल्या.या वेळी जेष्ठ नेते यु.आर. थोंबाळ, बी.टी.सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, सचिव निशांत हाके, केंद्रीय कार्यकारीणी सदस्य विक्रम कदम,बी.टी. सांगळे, राजु वाकळे, ऊपेंद्र दुधगावकर,लक्ष्मीकांत क्षिरसागर, यांच्यासह ,के.एस. वसेकर ,भारत कांदे, डी.के. देवकते, नारायण कदम,अमित मोगल, अनंत कुमार विश्वंभर, माधव शिंदे,डॉ.संतोष मळसटवाड, सुरेश हिवाळे,बाबासाहेब हेलसकर,बी.एन. शिंदे,कासांडे जे.व्ही.गौंडगावे आर.आर.,संतोष साखरे,गणेश खंडागळे,राऊत व्ही.डी.,विठ्ठल शिंदे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांच्या या मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत, तर राज्यभर तीव्र आंदोलने उभारण्याचे यावेळी ठरविण्यात आले.