शेतकऱ्यांचा आक्रोश : महाविकास आघाडीच्या मोर्चाने सेलू दणाणले
सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी : सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला योग्य भाव देण्याची मागणी
माजी आमदार विजय भांबळे यांनी सभेला संबोधित केले. परभणी जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहेत. मात्र, पालकमंत्री बैठक घेत नाहीत. केवळ झेंडावंदनला हजेरी लावत आहेत. जिल्हाभरातील विविध प्रश्न यामूळे प्रलंबित राहतात. रोहयो अंतर्गत सेलू, जिंतूर तालुक्यातील वृक्षलागवडीची शेतकऱ्यांची कामे सत्ताधारी आमदारांनी बंद केल्याने पाच हजार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तर ३५ हजार मजूरांच्या हातचे काम हिसकावून घेण्याचे पाप केले गेले आहे. शेतकऱ्यांनी मोठया कष्टाने वृक्ष लागवड केली. मात्र, सत्ताधारी आमदारांनी वृक्ष लागवडीमध्ये हस्तक्षेप करून शेतकर्यांना येणारा सरकारचा निधी बंद केला आहे, असा आरोप माजी आमदार भांबळे यांनी यावेळी केला.
सेलू (जि.परभणी) : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला योग्य भाव, गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी आदी प्रमुख मागण्यांसह सेलू, जिंतूर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत या मागणीसाठी महाविकास आघाडीच्यावतीने सेलू येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी, ६ जुलै रोजी दुपारी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीने सेलू दणाणून गेले.
राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वात लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा दरम्यान सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला. उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. या वेळी हेमंतराव आडळकर, अशोक काकडे, राजेंद्र लहाने, रामनाना पाटील, नामदेव डख, पवन आडळकर, सुधाकर रोकडे, रणजीत गजमल, रमेश डख, बाळासाहेब भांबळे, प्रकाश मुळे, मुरलीधर मते, रामेश्वर पौळ, माजीद बागवान, पुरूषोत्तम पावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार विजय भांबळे यांनी सभेला संबोधित केले. परभणी जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहेत. मात्र, पालकमंत्री बैठक घेत नाहीत. केवळ झेंडावंदनला हजेरी लावत आहे. जिल्हाभरातील विविध प्रश्न यामूळे प्रलंबित राहतात. रोहयो अंतर्गत सेलू, जिंतूर तालुक्यातील वृक्षलागवडीची शेतकऱ्यांची कामे सत्ताधारी आमदारांनी बंद केल्याने पाच हजार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तर ३५ हजार मजूरांच्या हातचे काम हिसकावून घेण्याचे पाप केले गेले आहे. शेतकऱ्यांनी मोठया कष्टाने वृक्ष लागवड केली. मात्र, सत्ताधारी आमदारांनी वृक्ष लागवडीमध्ये हस्तक्षेप करून शेतकर्यांना येणारा सरकारचा निधी बंद केला आहे, असा आरोप माजी आमदार भांबळे यांनी यावेळी केला. या वेळी प्रशासनामार्फत सरकारला निवेदन पाठविण्यात आले. तहसीलदार दिनेश झांपले यांनी निवेदन स्वीकारले. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी कर्ज फेडू शकत नसल्याने आत्महत्या करत आहेत. पीक विमा भरून संबंधित कंपनी नुकसान भरपाई देत नाही. शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही. पीक चांगले आले, तर वन्य प्राण्यांकडून नासाडी केली जात असल्याने शेतकरी त्रस्त आहे. सर्व महामंडळाना निधी उपलब्ध करून कर्ज प्रकरणे तसेच संजय गांधी निराधार, श्रावण बाळ आदी योजनांची प्रकरणे मंजूर करावीत आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मोर्चात निर्मला लिपणे, गोरख भालेराव, सुधाकर पवार, व्ही.पी.राठोड, ॲड.बालासाहेब रोडगे, दत्तूसिंग ठाकूर, पप्पू गाडेकर, विठ्ठल काळबांडे, आप्पासाहेब रोडगे, जिवन आवटे, विशाल देशमुख, शिवराज कदम आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्र पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.