…तर विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी सरकारचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही : मनोज जरांगे

…तर विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी सरकारचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही : मनोज जरांगे

हिंगोलीत शांतता रॅलीला विक्रमी गर्दी, आज परभणीमध्ये रॅली

हिंगोली : ‘मराठा समाज न्यायासाठी रस्त्यावर उतरला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाचा आक्रोश समजून घेण्याची गरज आहे. आरक्षण कुणाची मक्तेदारी नाही. मराठा आरक्षणावर सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून मराठ्यांवर अन्याय होणार असेल, तर विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी सरकारचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही, असा खणखणीत इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी शांतता रॅलीत मार्गदर्शन करतांना दिला.

जरांगे यांची रॅली हिंगोली जिल्ह्यातून शनिवारी सुरू झाली. सहा ते १३ जुलै दरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रॅली पोहोचणार आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी जरांगे यांनी १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर काढलेली शांतता रॅली विक्रमी गर्दीने गाजली. बळसोंड येथे जरांगे यांचे सकल मराठा समाजाने स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जरांगे यांनी इंदिरा गांधी चौकात जनसमुदायाशी संवाद साधला.

‘लोकसभा निवडणुकीत पाडा या शब्दाचा अनेकांनी धसका घेतला होता. विधानसभा निवडणुकीत नाव घेतले तर काय होईल? सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करून ते टिकवा या मुख्य मागण्या आहेत. विदर्भातील कुणबी व मराठवाड्यातील मराठा यांचा व्यवसाय एक आहे, त्यांच्यात नातेसंबंध आहेत. मग, आरक्षण का लागू होत नाही? सरकार हैदराबाद गॅझेट का लागू करीत नाही,’ असे सवालही जरांगे यांनी केला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!