अभिमानास्पद : सख्खी भावंडे लष्करात होणार अधिकारी
सेलूतील नखाते कुटुंबातील ऋतुराज पाठोपाठ श्रीराजही घेणार लष्करी शिक्षणाचे धडे
बाबासाहेब हेलसकर…
परभणी : ध्येय, चिकाटी, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यास या जोरावर डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये लष्करी शिक्षणासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षेत सेलू (जि.परभणी) येथील ऋतुराज रमेश नखाते पाठोपाठ, तेरा वर्षीय धाकटा भाऊ श्रीराज रमेश नखाते यांनेही यशस्वी झेप घेतली आहे. यानिमित्ताने नखाते कुटुंबातील दोन्ही भावंडांचे लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
ऋतुराज व श्रीराज यांचे वडील रमेश नखाते हे वालूर येथील श्रीमती शांताबाई नखाते आश्रमशाळेचे प्राचार्य आहेत , तर आई मनीषा गृहिणी आहेत. दोघांनीही दोन्ही मुलांची प्रवेशपूर्व परीक्षेच्या तयारी नियोबद्ध वेळ दिला.
सैनिकी शाळेत असताना कोरोनो काळात घरीच तयारी करून ऋतुराजची २०२१ मध्ये महाराष्ट्र कोट्यातून निवड झाली. त्याचे दहावीचे शिक्षणही सुरू आहे. बॉक्सिंगमध्ये गोल्ड, तर स्विमिंगमध्ये सिल्व्हर मेडल मिळविले आहे.क्षधाकटा भाऊ श्रीराज नखातेनेही मोठ्या भावाची प्रेरणा घेत, डिसेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत पार पडलेल्या लेखी, तोंडी परीक्षेत महाराष्ट्रातून अव्वल स्थान मिळवत राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. तसेच पाच दिवसांची वैद्यकीय चाचणीही दिली आहे. दोघेही सेलूतील व्हिजन इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहेत. स्वअभ्यासावर अधिकाधिक भर देत दोघांनी काठीण्यपातळीतील परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. कुटुंबातील दोन्ही भावंडांच्या यशाबद्दल वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल नखाते, सचिव भावना नखाते यांच्यासह विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी ऋतुराज, श्रीराज आणि वडील रमेश नखाते, आई मनीषा नखाते यांचा यथोचित सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
अशी असते परीक्षा…
दरवर्षी भारतातून २५ विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षेच्या माध्यमातून डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातो. यामध्ये महाराष्ट्रासाठी केवळ दोन, तर उत्तरप्रदेशसाठी तीन जागांचा कोटा असतो. अन्य राज्यांतून प्रत्येक एकालाच संधी मिळते. शिवाय झोन निहाय मुलींसाठी केवळ पाच जागा असतात. ही संस्था राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए), भारतीय नौदल अकादमी आणि त्यानंतर भारतीय सशस्त्र दलांसाठी पायाभूत संस्था मानली जाते. प्रवेश पूर्व परीक्षेसाठी वय वर्षे अकरा ते साडेतरा वयोगटाची अट आहे. ६ वी नंतर थेट आठवीमध्ये प्रवेश दिला जातो. इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून एनडीएमध्ये विद्यार्थ्यांना हमखास प्रवेशाची संधी मिळते. पुढे आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्समध्ये आवडीनुसार लेफ्टनंट अधिकारी म्हणून नियुक्ती मिळते. पदोन्नतीचीही संधी मिळते, असे प्राचार्य नखाते यांनी सांगितले.
अशी केली तयारी…
ऋतुराजप्रमाणेच श्रीराजचीनेही इयत्ता सहावीपासून तयारी सुरू केली. पूर्व परीक्षेला गणित २०० गुण, इंग्लिश १२५ आणि सामान्य ज्ञान ७५ गुणांचे पेपर आहेत.या विषयाच्या तयारीसाठी अरहिंत आणि गुप्ता प्रकाशनाच्या पुस्तकांसह गणितासाठी एनसीईआरटीच्या आर.डी.शर्मा यांची पुस्तके, इंग्रजी ग्रामरसाठी पाल ॲन्ड सुरी आणि रेन ॲण्ड मार्टीन यांच्या पुस्तकातून तर सामान्य ज्ञान या विषयासाठी युट्यूबवर ऑनलाईन क्लास सोबतच आरआयएमसीसाठी ‘द ऑनलाईन गुरू’ क्लासचा निश्चितच.फायदा झाला, असे सांगून दोन्ही मुलांचे देशसेवेचे स्वप्न निश्चित साकार होणार आहे, असे आई मनीषा नखाते यांनी सांगितले
मोठा भाऊ ऋतुराज याला भेटायला गेल्यानंतर राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजच्या वातावरणाने प्रभावित झालो. सकाळी पाच साडेपाचला उठणे. त्यानंतर वडील दीड तास होक्याबलरीचा सराव घेत. ब्रेकनंतर तीन-तीन तास इंग्रजीचा आणि गणिताचा आणि दोन तास सामान्य ज्ञान विषयाचा सराव करून रात्री साडे नऊला झोपणे. ऑनलाईन क्लास आणि युट्यूबवरील मार्गदर्शनासाठी केवळ अभ्यापुरता मोबाईल वापरणे. दरम्यानच्या काळात मित्रांसोबत खेळणे, असा हसत खेळत अभ्यास केला. आई वडीलचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आता मोठ्या भावाप्रमाणे लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. याचा आनंद आहे. – श्रीराज रमेश नखाते