जातीभेदविरहित देशभक्त विद्यार्थी निर्माण झाला पाहिजे : डॉ.सुरेंद्र आलुरकर; विवेकानंद विद्यालयात कृतज्ञता सोहळा उत्साहात
सकाश प्रतिनिधी, सेलू : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी वेगळेपण जपतात आणि हेच वेगळेपण महत्वाचे असते. समाजामध्ये दुही पसरावणारा जातीय भेद तसेच उच्च-नीचतेचा भाव यावर मात करणे गरजेचे आहे. आपल्या मनामध्ये प्रेम, द्वेष, दुजाभाव केवळ जातीमुळे निर्माण होऊ नये. हाच भाव प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर जातीभेद न मानणारा देशभक्त विद्यार्थी निर्माण झाला पाहिजे, असे परखड मत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर यांनी व्यक्त केले.
सेलू येथील विवेकानंद विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता व कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, स्थानिक अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर, शालेय समिती अध्यक्ष करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक शंकर शितोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील नूतन विद्यालय सभागृहात आयोजित समारंभात पुढे बोलताना ते म्हणाले की; इंग्रजी शाळांची वाढ ज्या गतीने होताना दिसते त्या गतीने मराठी शिक्षणाकडे वाढ होत नसल्याने समाजाच्या दृष्टीने दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येत आहे. मात्र अशाही परिस्थितीत सेलू येथे २५ वर्षांपूर्वी संस्थेने लावलेले छोटेसे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. विशेष समाधानाची बाब म्हणजे संख्यात्मक वाढीसोबतच गुणात्मक वाढ देखील होत आहे. याचे श्रेय संस्थेतील सर्व शिक्षकवृंदाना जाते. कारण ते कायम सेवावृत्तीनेच काम करतात. शालेय वेळेनुसार आठ तास आणि त्या आठतासाच्या बाहेर जाऊन शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना काय मिळते हीच खरी शैक्षणिक संस्थेची ओळख असते. सर्व शिक्षक वृंद संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत कामात मन व मनात काम हे ब्रीद जोपासत आहेत. हेच प्रगतीचे गमक असल्याचे डॉ.सुरेंद्र आलुरकर म्हणाले.
संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य म्हणाले की; समाजामध्ये काम करत असताना शिक्षक व पालकांची शक्ती सोबत असावी या हेतूने संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा जोपासण्यासाठी १९५१ साली संस्थेची स्थापना झाली आहे. भारतीय संस्कृती व विचारांची धार विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले जाते. याही पुढे जाऊन समाजातील वाईट चालीरीती थांबवण्याचे काम शिक्षक-पालक व विद्यार्थी हे करू शकतात. या विचारांनीच भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने संस्कार केंद्रांची स्थापना केलेली आहे आणि यासाठी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचे स्थापनेपासूनचे योगदान मोलाचे असल्या कारणाने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ.हेमंत वैद्य यांनी नमूद केले. यावेळी हरिभाऊ चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. गजानन साळवे यांनी पद्य सादर केले. प्रास्ताविक उपेंद्र बेल्लूरकर यांनी केले. सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी, तर करुणा कुलकर्णी यांनी आभार मानले. कृतज्ञता सोहळ्यात माजी पदाधिकारी संस्कार केंद्राचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, किरण डुघरेकर, सुधीर चौधरी, गौतमराव सूर्यवंशी, मकरंद दिग्रसकर, लीलाताई देशपांडे, गणेशकुमार कोठेकर, सत्येंद्र चौधरी, आनंदी कोठेकर आदी पदाधिकारीसह गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली.