विधानपरिषद : महायुतीचा महाविकास आघाडीला धक्का; कॉंग्रेसच्या मतपुटीचा अजित पवार गटाला फायदा

विधानपरिषद : महायुतीचा महाविकास आघाडीला धक्का; कॉंग्रेसच्या मतपुटीचा अजित पवार गटाला फायदा

मुंबई : काँग्रेसच्या मतांमध्ये झालेली फाटाफूट आणि महाविकास आघाडीच्या छोट्या घटक पक्षांसह बहुसंख्य अपक्ष आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मदत केल्याने विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव यांनीही विजय मिळवला. मात्र, अकराव्या जागेसाठी महाविकास आघाडीतीलच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यात नार्वेकर यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर पाटील यांच्यावर मात केली. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक निकालात कुणाचे बारा वाजणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. विधानभवनाच्या चौथ्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानाची मुदत दुपारी चार वाजेपर्यंत होती. मतदानानंतर संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला वैध मतांची मोजणी करण्यात आली आहे. यात एकही मत बाद ठरले नाही. त्यामुळे पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी २३ मतांचा कोटा निश्चित झाला. भाजपच्या योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके आणि अमित गोरखे यांनी पहिल्या फेरीत हा कोटा पूर्ण केला. सदाभाऊ खोत यांना पहिल्या फेरीत २२ मतांवर अडकून राहावे लागल्याने त्यांचा दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे विजय निश्चित झाला. भाजपने काँग्रेसची फुटीर आणि छोट्या पक्षांची मते मिळवून आपल्या पाचही उमेदवारांना निवडून आणले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ४० मते होती. या गटानेही काँग्रेसची काही मते आणि अपक्षांच्या मदतीने आपले राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे या दोन उमेदवारांच्या माथी विजयाचा गुलाल लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या ३७ आमदारांसह अपक्षांच्या साथीने भावना गवळी आणि कृपाल तुमाने हे दोन शिलेदार विधान परिषदेवर पाठविण्यात यश मिळवले. काँग्रेसला सुरुवातीपासून मतफुटीचा धोका होता. त्यामुळे काँग्रेसने डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासाठी २७ मतांचा कोटा निश्चित केला होता. उर्वरित मते मिलिंद नार्वेकर यांच्या पारड्यात टाकण्यात आली. त्यामुळे डॉ. सातव पहिल्या फेरीत निवडून आल्या, तर नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची २२ मते मिळाली. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असलेले नार्वेकर दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे विजयी झाले. जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची १२ मते मिळाली. शरद पवार गटाचे विधानसभेत १२ आमदार आहेत. त्यांचीच मते पाटील यांना मिळाली. त्यामुळे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, विधानसभेतील सर्व २७४ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात तुरुंगात असल्याने त्यांना मतदानात भाग घेऊ देऊ नये, अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र, ही मागणी फेटाळण्यात आली. गायकवाड यांनी तुरुंगातून येऊन मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे बबनराव पाचपुते, शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे यांनी व्हील चेअरवर येऊन मतदान केले. काँग्रेसच्या अमीन पटेल यांनी वॉकरच्या साह्याने मतदानात भाग घेतला.

शेकापच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह

शेकापचे पुरेसे संख्याबळ नसतानाही सलग चार वेळा विधान परिषदेवर निवडून जाण्याचा विक्रम करणारे जयंत पाटील यांना या वेळी पराभवाचा सामना करावा लागला. पाटील सन २००० मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यानंतर २००६, २०१२ आणि २०१८च्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. विधान परिषदेत सलग २४ वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या पाटील यांना ताज्या पराभवाने मोठा धक्का बसला आहे. पाटील यांच्या पराभवाने विधान परिषदेतील शेकापचे अस्तित्व मिटल्याचे बोलले जाते.

credit : Mata

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!