कापूस, सोयाबीन जोमात; परभणीमध्ये खरीपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात

कापूस, सोयाबीन जोमात; परभणीमध्ये खरीपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात

सेलू जि.परभणी  : परभणी जिल्ह्यात अंतिम टप्प्यात ११ जुलैपर्यंत खरीपाच्या पेरण्याची एकूण टक्केवारी ८५.८ पोहोचली आहे. सरासरी पाच लाख ३४ हजार ९०० हेक्टर पैकी चार लाख ५९ हजार ३५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. परभणी जिल्हा कृषी विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. दरम्यान, मूग आणि उडीदाचे क्षेत्र दरवर्षी घटत असून तुलनेत सोयाबीनचा पेरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर सोयाबीनसोबतच कापूस पिकांच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचा अधिक भर दिसून येत आहे. 
परभणी जिल्ह्याची शेतजमीन काळी कसदार, सुपीक आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसला आहे. शेतकऱ्यांना कधी दुष्काळाचा, कधी सततच्या पावसाचा तर कधी अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व हाती आलेल्या पिकांना कवडीमोल भाव मिळत असल्याने परभणी जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांवर कायम आर्थिक संकटात सापडलेला आहे. यंदाही पावसाने अधुनमधून चांगलीच ओढ दिली.‌ जिल्ह्यातील विविध भागात अनियमित व भाग बदलत खंड खंड पाऊस झाला. या वर्षी १० जुलैपर्यंत सरासरीपेक्षा २० टक्के अधिक २५९.१ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. जून, जुलै महिन्यात कुठे पेरणी योग्य तर कुठे जुजबी पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे ११ जुलैपर्यंत खरीपाच्या पेरण्याची सरासरी ८५.८ टक्क्यांवर पोहोचली आहे. पाच लाख ३४ हजार ९०० हेक्टर पैकी चार लाख ५९ हजार ३५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. परभणी जिल्ह्यात खरीप हंगामात मूग, उडीद, तूर आदी डाळवर्गीय कडधान्य पिकांच्या पेरणीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत, तुलनेत सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा मोठा कल वाढतांना दिसून येत आहे. सोयाबीनची सर्वाधिक दोन लाख ३४ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर (९३.८ टक्के) लागवड झाली आहे. तर नगदी पिक म्हणून ओळखले जाणार्‍या कापूस पिकाची लागवड १ लाख ८७ हजार ३११ हेक्टर (९७.५ टक्के) झाली आहे. कडधान्यामध्ये तूरची लागवड सरासरी २९ हजार ९२४ हेक्टर (६५.१ टक्के), तर एकूण अन्नधान्याची ३७ हजार ३३७ हेक्टर ४०.४९ टक्के) लागवड झाली आहे.
या वर्षी कमी अधिक प्रमाणात पण, चांगला पाऊस झाला आहे.‌ त्यामुळे परिसरात जवळपास शंभर टक्के पेरण्या झाल्या आहेत. सध्या पिकांना पोषक वातावरण आहे. मात्र, खतांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. आवश्यक त्या खताचा व्यापाऱ्यांकडून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. त्यामुळे पर्यायी कंपन्यांच्या खतांचा वापर शेतकरी करीत आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांना आवश्यक ती खते बी बियाणे, औषधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.‌ – वसंतराव खेडेकर, शेतकरी, शिराळा ता.सेलू जि.परभणी
परभणी जिल्हा : तालुकानिहाय पेरणी पूर्ण झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये ( कंसात टक्केवारी) 
परभणी : ८४७८६.५ (८७.४)
गंगाखेड : ५१३६५ (८८.९)
सोनपेठ : ३२६९२.४ (९३.३)
पालम : ४४९४० (९८.५ )
पाथरी : ४०४३० (८९.९)
मानवत : ३४८२६ (८१.८)
जिंतूर : ७२१३३ (७३.७ )
पूर्णा : ४६०४९ (८६.१)
सेलू : ५१८१४ (८५.६)
परभणी जिल्हा एकूण सरासरी पेरणी क्षेत्र : पाच लाख ३४ हजार ९०० हेक्टर
* पूर्ण झालेले पेरणी क्षेत्र : चार लाख ५९ हजार ३५ हेक्टर
* सोयाबीन : दोन लाख ३४ हजार २२७ हेक्टर
* कापूस : १ लाख ८१ हजार ९२० हेक्टर
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!