अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी कॉ.राजन क्षीरसागर

अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी कॉ.राजन क्षीरसागर

 

अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी कॉ.राजन क्षीरसागरपरभणी : नवी दिल्ली येथे अखिल भारतीय किसान सभेच्या (एआयकेएस) झालेल्या बैठकीत परभणी येथील कॉम्रेड राजन क्षीरसागर यांची अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. देशपातळीवरील श्रमिकांच्या या संघटनेचे अध्यक्षपद कॉ.क्षीरसागर यांच्या रूपाने महाराष्ट्रातील एका संघर्षशील नेत्यास मिळाले आहे. यापूर्वी महाराष्ट्रातून क्रांतीसिंह नाना पाटील यांनी या संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती.
नवी दिल्ली येथे १५ व १६ जुलैला अखिल भारतीय किसान सभेची बैठक पार पडली होती. या बैठकीत राजन क्षुरसागर हे अध्यक्ष तर राऊला व्यंकटेश हे जनरल सेक्रटरी म्हणून निवडले गेले. या बैठकीत ‘क्रांतीसिंह नाना पाटील, जीवन व कार्य’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्षपद यापूर्वी देशपातळीवरील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी भूषविले आहेत. स्वामी सहजानंद सरस्वती, एन.जी. रंगा, इंदुलाल याज्ञीक, राहुल सांकृत्यायन, बाबा सोहनसिंग भकना, क्रांतीसिंह नाना पाटील, ए.के. गोपालण, प्रबोध पांडा आदींचा समावेश आहे. देशातील नैसर्गिक संसाधने बड्या भांडवलदाराच्या घशात घालण्याचा उद्योग केंद्र सरकारने चालवला असून या विरोधात अखिल भारतीय किसान सभेने सातत्याने आवाज उठवला आहे. देशातल्या अन्य श्रमिक व शेतकर्‍यांच्या चळवळींना सोबत घेवून संयुक्त किसान मोर्चा मजबूत करण्यासाठी येत्या क्रांतीदिनी देशपातळीवर ‘डब्ल्युटीओ चले जावो आंदोलन’ करण्यात येईल. तसेच दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील केंद्राच्या जाचक अटी दूर करण्यात याव्यात. यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल. दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत असतानाही त्यांना सरकारी धोरणांमुळे न्याय मिळत नाही. यासाठी सातत्याने संघर्ष केला जाईल अशी प्रतिक्रिया कॉ.राजन क्षिरसागर यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दिली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!