NEET-UG 2024 : शनिवारी १२ वाजेपर्यंत केंद्रनिहाय निकाल वेबसाईटवर जाहीर करा : ‘एनटीए’ला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
-
परीक्षेची बदनामी व्हावी म्हणून नव्हे, तर कोणी तरी पैसे कमावण्यासाठी हे करीत होते, हे उघड आहे. मोठ्या प्रमाणात पेपरफुटीसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये त्या स्तरावरही संपर्क आवश्यक असतात. – सर्वोच्च न्यायालय
-
उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत ‘एनटीए’ला विद्यार्थ्यांचे गुण वेबसाइटवर प्रसिद्ध करावे लागणार
-
कथित कलंकित परीक्षा केंद्रांवरील उमेदवारांना इतरांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत की नाही हे खंडपीठ तपासणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘नीट-यूजी २०२४चा निकाल उद्या, शनिवारी (२० जुलै) उमेदवारांची ओळख लपवून परीक्षा केंद्रनिहाय तसेच शहरनिहाय जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रीय चाचणी संस्थेला (एनटीए) दिला. ‘संपूर्ण परीक्षेचे पावित्र्य बाधित झाल्याचे भक्कम कारण असेल तरच ‘नीट’च्या फेरपरीक्षेचा आदेश देता येईल,’ असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. पाच मे रोजी देशभरात घेण्यात आलेल्या ‘नीट-यूजी’ २०२४च्या आयोजनातील कथित अनियमिततांची चौकशी करावी, परीक्षा रद्द करावी आणि फेरपरीक्षा घ्यावी, असे निर्देश देण्याची
पाच मे रोजी देशभरात घेण्यात आलेल्या ‘नीट-यूजी’ २०२४च्या आयोजनातील कथित अनियमिततांची चौकशी करावी, परीक्षा रद्द करावी आणि फेरपरीक्षा घ्यावी, असे निर्देश देण्याची विनंती करणाऱ्या ४०हून अधिक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गुरुवारी दिवसभर सुनावणी घेतली. ११ जुलै रोजी ही सुनावणी खंडपीठाने पुढे ढकलली होती.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठामध्ये न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांचा समावेश आहे. कथित गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांवर उपस्थित उमेदवारांना इतर केंद्रांवरील उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत की नाही हे आम्हाला तपासायचे आहे. त्यामुळे येत्या शनिवारी (२० जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारांची ओळख लपवून नीट-यूजी २०२४चा निकाल केंद्रनिहाय तसेच शहरनिहाय जाहीर करा. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण तुमच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करा. तुम्ही डमी रोल नंबर देऊ शकता; पण गुणांचा आकृतिबंध काय आहे ते आम्हाला परीक्षा केंद्रनिहाय पाहायचे आहे,’ असे खंडपीठाने ‘एनटीए’ला सांगितले.
दरम्यान, पुढील सुनावणी सोमवारी, २२ जुलै रोजी होणार आहे. ‘नीट’ आयोजनात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा दावा सिद्ध करण्यासह, पेपरफुटी नियोजनबद्ध होती आणि त्याचा परिणाम संपूर्ण परीक्षेवर झाल्याचे दाखवून द्या. शिवाय परीक्षा रद्द का करायची आणि फेरपरीक्षा का घ्यायची हेही सिद्ध करा, असे खंडपीठानेयाचिकाकर्त्या उमेदवारांच्या वकिलांना सांगितले. प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे, प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकरण पाटणा आणि हजारीबागपुरतेच मर्यादित होते. गुजरातमधील गोध्रा येथे असे काही घडले नाही असे म्हणता येणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले. पाटणा आणि हजारीबाग येथे प्रश्नपत्रिका फुटली होती, तर गोध्रामध्ये असे दावे करण्यात आले होते की, परीक्षेत सहभागी असलेल्या व्यक्तीने काही उमेदवारांच्या ओएमआर शीट्स भरण्यासाठी पैसे घेतले होते.’टेलिग्राम’ या समाजमाध्यम मंचावर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून खंडपीठ म्हणाले, ‘तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल, की असे करण्याची कल्पना राष्ट्रीय चर्चा घडवण्यासाठी कुणाला सुचली नव्हती.
♦चार एमबीबीएस विद्यार्थ्यांना अटक
नवी दिल्ली: वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ मधील पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पाटण्यातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून (एम्स) चार वैद्यकीय विद्यार्थ्यांना अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. चंदनसिंह, राहुल अनंत, कुमार शानू हे तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी असून, करण जैन हा दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले असून, वसतिगृहातील त्यांच्या खोल्या सील करण्यात आल्या आहेत.