परभणीतील पाणी प्रकल्प तहानलेच; मोठ्या पावसाची प्रतीक्षा
बाबासाहेब हेलसकर
परभणी : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी परभणी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पांसह गाव तलाव आणि पाझर तलाव अद्यापही पाण्यासाठी तहानलेलेच आहेत. जिल्ह्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून लघु व मध्यम प्रकल्प न भरल्यास परिसरातील गावांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावू शकतो.जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने गुरुवारी (१८ जुलै) रोजी कळविलेल्या साप्ताहिक अहवालानुसार दोन मध्यम प्रकल्पात सरासरी ११ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील करपरा (पूर्णसंचय क्षमता २८.८२ दलघमी) पाणलोटक्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा २१ टक्के आहे. तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी (२७.१४१ दलघमी) या मध्यम प्रकल्प परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे प्रकल्पात अवघा दोन टक्के उपयुक्तत पाणी साठा निर्माण झाला आहे. २२ लघु प्रकल्पापैकी दोन लघु तलाव कोरडेठाक असून ११ तलावातील पाणीसाठा जोत्याखालीच आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास परिसरातील वाड्या, वस्त्यांमध्येही पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. २२ पैकी ९ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला. यापैकी काही कोरडेठाक पडण्याच्या स्थितीत आहेत. गतवर्षी जिल्ह्यातील पर्जन्यमानात ३२ टक्के तूट आली होती. त्यामुळे यंदाचा पावसाळा सुरू होईपर्यंत जिंतूर तालुक्यातील करपरा आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी या दोन मध्यम प्रकल्पामध्ये केवळ मृतसाठा शिल्लक होता. देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, केहाळ, दहेगाव,भोसी, आडगाव (ता. जिंतूर) पेडगाव (ता.परभणी), आंबेगाव (ता. मानवत) हे १२ लघु तलाव कोरडे पडले होते. नखातवाडी (ता. सोनपेठ), पिंपळदरी, कोद्री, टाकळगाव (ता. गंगाखेड), कवड, मांडवी, पाडाळी (ता.जिंतूर) या सात लघु तलावातील पाणीसाठा जोत्याखाली गेला होता. झरी (ता.पाथरी), तांदुळवाडी (ता.पालम), राणीसावरगाव (ता. गंगाखेड) तलावांमध्ये सरासरी एक टक्का उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. दरम्यान, जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात तसेच सेलू तालुक्यातील निम्न दुधना धरणामध्ये पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. लघु प्रकल्पांपैकी पालम तालुक्यातील तांदुळवाडी प्रकल्पात ६१ टक्के उपयुक्तता पाणी साठा उपलब्ध झाला आहे.
♦पाणी पातळी वाढेना
दमदार पावसाच्या सरी कोसळत नसल्याने सेलू तालुक्यातील पाच पाझर आणि पाच गाव तलावही अद्यापही कोरडे ठाक आहेत. खरीप हंगामातील पिके बहरात आहेत परंतु, पिकाची वाढ होण्यासाठी चांगल्या पावसाची गरज निर्माण झाली आहे. गाव तलाव व पाझर तलावाच्या माध्यमातून गाव व शेत शिवारातील वाहून जाणाऱ्या पाण्याची साठवणूक केली जाते. तलावत शंभर टक्के जलसाठा झाल्यानंतर जवळपास २४२ हेक्टर वरील पिकांना पाण्याचा आधार मिळतो. तसेच जमिनीतील पाणी पातळी वाढते. परिणामी टंचाई काळात पिण्याचे पाणी काही प्रमाणात ग्रामस्थांना उपलब्ध होते. सेलू तालुक्यातील नरसापुर, पिंपरी गोंडगे, तांदुळवाडी, गिरगाव, देवगाव आणि वालूर येथे पाझर तलाव तर हादगाव, तांदुळवाडी, गिरगाव, नरसापुर व सावंगी येथे जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाचे गाव तलाव आहेत. दोन वर्षांपूर्वी जून महिन्यातच पावसाला सुरुवात झाली तसेच परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग केली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गाव आणि पाझर तलाव तुडुंब भरले होते. या वर्षी सर्वदूर पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अद्यापही बोअर व विहीरीची पाणी पातळी वाढली नाही. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकाची आंतरमशागत व खते देऊन शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तसेच पाझर आणि गाव तलाव भरण्यासाठी मुसळधार पावसाची गरज निर्माण झाली आहे.