रिमझिम पावसाने पिके बहरली; सूर्यदर्शन होईना
परभणीत जनजीवन विस्कळित
परभणी : गेल्या सहा दिवसांपासून परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत अधूनमधून केवळ रिमझिम पाऊस होत आहे. कुठेकुठे जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे नागरिकांना सहा दिवसांपासून सूर्यदर्शनही होईना. मात्र, रिपरिप पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. जून महिन्यापासून परभणी जिल्ह्यात अनियमित आणि खंड खंड पाऊस होत आहे. २५ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३७०.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. रिमझिम पावसाने सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस ही खरीप हंगामातील पिके बहरली असली, तरी दमदार पावसाची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षाच आहे. गाव तलाव, पाझर तलाव, लघु, मध्यम प्रकल्पात तसेच निम्न दुधना व येलदरी सारख्या प्रमुख प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित पाण्याची आवक नाही. जुलै महिना संपत आला, तरी ठोक पाऊस नसल्याने विहिरी, बोअरची पाणी पातळी वाढली नाही. रिमझिम पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गावातील रस्ते चिखलममय, निसरडे झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. आंतरमशागती थांबल्या आहेत. शेत रस्त्यांनी चिखल झाल्यामुळे बैलगाड्यांसह अन्य वाहने शेतापर्यंत नेण्यात अडचणी येत आहेत. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १७.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे (कंसात १ जूनपासून आजपर्यंत झालेला पाऊस) : परभणी १७.१ (३४०), गंगाखेड २३.५ (४६५.८), पाथरी ११.६ (३१६.६), जिंतूर १५.७ (३९४.३), पूर्णा २३.२(३५५.२), पालम २४.८ (३९६.७), सेलू ११.५ (३४५.२) सोनपेठ १९.१ (३८४.७) मानवत १६ (३४७.९) पाऊस पडला आहे.