सेलूमध्ये शेतकरी समृद्धी कार्यशाळा उत्साहात
परभणी : हरभरा आणि गहू या पिकांसाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठीही ‘वने मॉडेल’ उपयुक्त असून शेतकऱ्यांना याचा निश्चित फायदा होणार आहे, असे मत कृषिभूषण दत्तात्रय वने यांनी सेलू येथे व्यक्त केले. निम्न दुधना प्रकल्पावरील पाणी वापर संस्था सक्षमीकरण प्रकल्पातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी ‘शाश्वत शेती सिंचनासाठी पाणी वापर संस्था व पीक स्वातंत्र्य आणि पाणी व्यवस्थापन’ या विषयावर सेलू येथे आयोजित शेतकरी समृद्धी कार्यशाळा उत्साहात पार पडली.
यावेळी ‘पीक व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना श्री.वने बोलत होते. छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आणि मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था स्वायत्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (२२ जुलै) श्री साई नाट्य मंदिरात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी ऑनलाइन उपस्थित होते. याप्रसंगी सीएडीएचे मुख्य अभियंता जयंत गवळी, डॉ.विजय घोगरे, डॉ.सुरेश मैन्द, अधीक्षक अभियंता सुधाकर कचकलवार, माजलगाव कालवा कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, प्रकल्प व्यवस्थापक डॉ.गणेश बडे, नेवासा येथील जगदंबा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शशीशेखर भोरे, कृषिभूषण दत्तात्रय वने (राहुरी) आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शशीशेखर भोरे यांनी मुळा सिंचन प्रकल्पातील पाणी वापर संस्थांचा इतिहास मांडून विविध विषयावर मार्गदर्शन केले. सेलू कृषक शेतकरी उत्पादक कंपनीचे सुनील पौळ यांनी लोअर दुधना प्रकल्पाची उर्वरित कामे लवकर पूर्ण करून प्रकल्प संस्थांकडे हस्तांतरित करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सिंचन सुविधा शेतकरी उत्पादक कंपनीकडून उपलब्ध असेल तसेच उत्पादीत शेतमालाचे कंपनी मूल्यवर्धन करणार असल्याचे सांगितले. डॉ.सुरेश मैन्द यांनी पाणी वापर संस्थेच्या मधील दुवा म्हणून काम करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती दिली. लाभधारक शेतकऱ्यांनी २००५ चा कायदा समजून घेणे अतिशय आवश्यक आहे, असे नमूद केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.गणेश बडे यांनी केले. कनिष्ठ अभियंता श्री.तिडके यांनी आभार मानले.