भाजपच्या फसव्या घोषणांना सर्वसामान्य जनता वैतागली : जयंत पाटील यांची टिका

भाजपच्या फसव्या घोषणांना सर्वसामान्य जनता वैतागली : जयंत पाटील यांची टिका

परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निष्ठावानांचा संवाद मेळावा

परभणी : लोकसभा असो, की विधानसभा प्रत्येक निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने केलेल्या फसव्या घोषणांना सर्वसामान्य जनता वैतागली आहे. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडायचा आणि सत्तेत आल्यावर त्याकडे कानाडोळा करायचा, हे आता सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे जनता भाजपच्या फसव्या घोषणांना बळी पडणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणी येथे भारतीय जनता पक्षावर टिका केली.

परभणी येथील वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात शुक्रवारी, २६ जुलै रोजी ‘निष्ठावानांचा संवाद मेळावा’ आयोजिण्यात आला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना श्री.पाटील बोलत होते. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड.विजय गव्हाणे, माजी आमदार सीताराम घनदाट, विजय भांबळे, व्यंकटराव कदम, भिमराव हत्तीअंबीरे, अजय गव्हाणे, प्राध्यापक किरण सोनटक्के, माजी नगरसेवक जाकेर लाला, मनिषा केंद्रे, रितेश काळे, सोनाली देशमुख, अतिश गरड, अशोक काकडे आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.पाटील यांनी भाषणातून भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली. भारतीय जनता पक्षाने सातत्याने नकारात्मक राजकारण केले. विशेषतः विरोधकांना, विरोधी पक्षांना संपविण्याचा कुटील डाव खेळला. स्वतःची अख्खी हयात घालून पक्ष उभारणारे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार असो, की शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे. यांचा पक्ष फोडण्याचे पापसुध्दा भाजपाने केले. त्यामुळेच आगामी निवडणुकीत भाजपला त्या पापाचे प्रायश्‍चित्त निश्‍चितच भोगावे लागेल, अशी टिका  श्री.पाटील यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ज्या ज्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद आहे. त्या ठिकाणी बैठका घेऊन, सर्वांगाने परिस्थितीचा आढावा घ्यावयाचा निर्णय पक्षाने घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही श्री.पाटील यांनी दिली. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.गव्हाणे यांनीही भाषणात महायुतीच्या जातीवादी विचारांवर जोरदार टिका केली. लोकसभा निवडणुकीत काही जिल्ह्यात जातीवादी विचार पेरण्याच्या भाजपाने केलेल्या प्रयत्नांना सर्वसामान्य जनतेने मोठा तडाखा देऊन अद्दल घडविली आहे, असे नमूद करीत परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराच्या मागे राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्ष भक्कमपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या वाटपात निष्ठावंतांचाच विचार व्हावा, अशी अपेक्षाही श्री.गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केली. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस रमाकांत कुलकर्णी यांनी केले. मेळाव्याला मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!