योगासन स्पर्धा : एकाग्रतेसाठी योगाभ्यास आवश्यक : अशोक अंभोरे
सेलूतील नूतन विद्यालयात परभणी जिल्हास्तरीय निवड चाचणी व योगासन स्पर्धा उत्साहात
सेलू : अनेक वेळा मुलांना एखादा धडा पाठांतर केल्यानंतरही लक्षात राहीत नाही. मुलांच्या अभ्यासाची चिंता वाटत असेल तर मुलांची एकाग्रता आणि फोकस वाढवण्यासाठी त्यांनी योगासने करायलाच हवेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अशोक अंभोरे यांनी केले. शनिवार, दि.२७ जुलै रोजी परभणी जिल्हा योगासन असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योगा परिषद यांच्या वतीने परभणी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेच्या निवड चाचणी निमित्ताने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील होते. याप्रसंगी डॉ.शैलेश मालाणी, संदीप बोकन, उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, प्रा.नागेश कान्हेकर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना त्वचारोग तज्ञ डॉ.शैलेश मालाणी म्हणाले की, पालकांना मुलांच्या अभ्यासाची चिंता वाटत असते. मुलांनी एखादा धडा बऱ्याच वेळा पाठांतर करूनही त्यांना लक्षात राहत नसेल, तर मुलांची एकाग्रता आणि फोकस वाढवण्यासाठी त्यांच्या रुटीनमध्ये या योगासनांचा समावेश करा. योग मुलांना तणाव नियंत्रित करण्यास आणि त्यांची एकाग्रता, लक्ष केंद्रित करण्यास आणि स्मरणशक्ती वाढविण्यात मदत करू शकतो.
मुख्याध्यापक एस.व्ही. पाटील म्हणाले की, शालेय जीवनातच योगासनाची गोडी निर्माण झाली, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिक, शारीरिक तंदुरूस्तीसोबत अभ्यासातही या खेळाचा त्यांना खूप चांगला उपयोग होईल. पुढे यातून आपण राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून नावारूपास येतील. पंच म्हणून माधव देशपांडे, शिल्पा पिंपळे, कृष्णा होलिया, सोमनाथ महाजन, सुष्मा सोमाणी, सुष्मिता भरदम बाळू बुधवंत उपस्थित होते. यावेळी योग मार्गदर्शक खेळाडू प्रशांत घिके, नानाभाऊ काटे, पंडित दाभाडे, संगीता दाभाडे यांचा गौरव करण्यात आला. काव्या राजवाडकर, यशिका खराटे, सृष्टी सोळंके, श्रुती खंदारे यांनी योगासनाचे चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली. प्रास्ताविक स्पर्धा संयोजक तथा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हा सचिव डी.डी.सोन्नेकर यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, तर प्रा.नागेश कान्हेकर यांनी आभार मानले.