ई-पॉस मशिन बंद : सर्व्हर डाऊनमुळे धान्य वाटप ठप्प
महिनाभरापासून दुकानदार त्रस्त; लाभार्थ्यांकडून संताप
परभणी : गेल्या महिनाभरापासून सर्व्हर व नेटवर्क नसल्यामुळे परभणी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडील ई-पॉस मशिन बंद पडलेल्या आहेत. मशिनद्वारे धान्य वितरण व्यवस्था ठप्प झाल्यामुळे दुकानदार त्रस्त झाले आहेत, तर धान्य मिळत नसल्याने लाभार्थी संताप व्यक्त करीत आहेत.
या संदर्भात सेलू तालुका रास्तभाव दुकानदार संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष बाबूआप्पा साळेगावकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना तहसीलदारामार्फत २५ जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे.ई-पॉस मशिन चालत नसल्याने जूलै महिना सरत आला तरी या महिन्याचे धान्य वाटप करण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत दुकानदार दुकानात बसून राहतात मात्र, परंतु दिवसदिवसभर नेटवर्क येत नाही. त्यामुळे धान्य वाटप करता येत नाही. यामुळे लाभार्थीही वैतागून संताप व्यक्त करीत आहेत. नेटवर्क बाबत सर्वच दुकानदार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागत आहेत. तेव्हा एनआयसीचे काम चालू आहे, असे सांगितले जात आहे. जूनपासून दिल्लीवरुन सर्व्हरचे काम चालू होते. तेव्हा महाराष्ट्रातील सर्व मशिन बंद होत्या. त्यामुळे बऱ्याच दुकानदाराचे वाटप राहीले होते. त्यावेळी वरिष्ठाकडून मुदतवाढ देण्याची कार्यवाही करावी अशी विनंती केली होती. परंतु, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट महिन्याच्या ३ ते ४ तारखेपर्यंत सुरु राहणाऱ्या ई-पॉस मशिन ३० जून रोजी रात्री ८ वाजता बंद करून मशिनवरील पूर्ण धान्य साठा कमी केला आहे. त्यामुळे बरेच लाभार्थी धान्यापासून वंचित राहीले. मशिनला भरपूर नेटवर्क देऊन दिवसभर मशिन चालेल अशी व्यवस्था करावी; अन्यथा कार्यालयाचा प्रतिनीधी देऊन ऑफलाईन धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी. १५ ऑगस्टपर्यंतचा डाटा मशिनवर टाकून धान्य वाटपाची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी सेलू तालुक्यातील रास्तभाव दुकानदार उपस्थित होते.
♦भिंतीवर लावले प्रसिद्धीपत्रक
दरम्यान, अन्न नागरी पुरवठा विभागाने शनिवारी, २७ जुलै रोजी काढलेले प्रसिद्धीपत्रक रास्त भाव दुकानदारांनी दुकानाच्या दर्शनी भागात भिंतीवर लावून दिले आहे. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्याचे बायोमॅट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरीता रास्तभाव दुकानांमध्ये ४ जी तंत्रज्ञान असलेल्या ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या आहेत. परंतु काही दिवसापासून ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य वितरण करतांना तांत्रिक अडचणी येत आहेत. ही तांत्रिक समस्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.