नव्या आघाडीचा सक्षम पर्याय देणार : राजू शेट्टी

नव्या आघाडीचा सक्षम पर्याय देणार : राजू शेट्टी

परभणी दौऱ्यात पत्रकार परिषेदत माहिती

परभणी : जनसामान्यांच्या आधार असलेल्या चळवळी मजबूत व्हाव्यात म्हणून चळवळीतील घटक असलेल्या पक्ष व संघटनांना एकत्र घेऊन विधानसभा निवडणुकीत राज्याला नव्या आघाडीचा सक्षम पर्याय देणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजु शेट्टी यांनी मराठवाडा दौर्‍यादरम्यान बुधवारी, ३१ जुलै रोजी दिली. परभणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री.शेट्टी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री.शेट्टी यांनी सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे कुणीही लक्ष देत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात शेतकरी चळवळीतील छोट्या समविचारी संघटना एकत्र घेऊन पुढे जाणार आहोत. त्यासाठी २४ ऑगस्ट रोजी शेगाव येथे महत्त्वाची संयुक्त बैठक होणार असून त्यामध्ये स्वतंत्र भारत पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी संघटना, बी.आर.एस. आणि शेतकरी संघटना अशा छोट्या घटकांना एकत्र आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी आणि विरोधात असलेल्या मोठ्या पक्षांना छोटे घटक पक्ष संपवायचे आहेत. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी किंवा सत्ताधारी यांच्यासोबत जाणार नाही. आतापर्यंत महादेव जानकर, जयंत पाटील, कपील पाटील आणि माझ्यासह इतर छोट्या घटक पक्षांना याचा चांगला अनुभव आलेला आहे. मतांंसाठी जवळ घ्यायचे आणि नंतर त्यांना संपवायचे, हे काम केले जात आहे. त्यामुळे चळवळ जिवंत राहावी, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. परिवर्तनाची लाट आली तर लोक उभे राहतात. त्याच संधीचा फायदा घेऊन आम्ही निवडणूक लढणार आहोत, असे श्री. शेट्टी यांनी सांगितले. नव्या आघाडीत कोण कोण येणार? याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही आमचे काम करत असून चळवळ सोडली नाही. येणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये नव्या आघाडीत मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली आहे. समविचारी असलेले घटक आम्ही सोबत घेणार आहोत. अनेकांशी भेटीगाठी व चर्चा सुरू असून श्री. कडू यांनी आमच्यासोबत यावे, यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात घडत आहेत. एक जुलैपासून राज्यात स्वाभिमानीच्या वतीने स्व.वसंतराव नाईक कर्जमुक्ती अभियान राबविले जात आहे. केंद्राने शेती क्षेत्रात राबविलेली धोरणे सोयाबीन, कापूस, मका उत्पादकांना कर्जाच्या खाईत लोटणारी असून शेतकर्‍यांना हमीभावसुध्दा मिळत नसल्याने उत्पादनखर्चापेक्षा कमी भावात शेतमाल विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शेतमालाचे भाव पाडले जातात. परिणामी शेती तोट्यात जावून शेतकरी आत्महत्येकडे वळत आहेत. मात्र सरकारचे याकडे लक्षच नसल्याचा आरोप श्री.शेट्टी यांनी केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीणसारख्या सवंग लोकप्रिय योजनांच्या सरकारच्या धोरणावरही श्री.शेट्टी यांनी टीका केली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!