जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघ : अल्पवयीन मुलांची नावे मतदारयादीत
माजी आमदार भांबळे यांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
परभणी : जिंतूर आणि सेलू तालुक्यातील मतदार यादीमध्ये १४ ते १७ वर्ष वयांच्या मुलांची नावे टाकण्याचे काम सुरू आहे. अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी शुक्रवारी ( २ ऑगस्ट) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन केली आहे. हा प्रकार तत्काळ थांबवावा तसेच जे मतदार गेल्या अनेक वर्षांपासून येथे राहतात त्यांची नावे यादीतून कमी केली आहेत. ती नावे मतदार यादीत कायम ठेवण्यात यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
जिंतूर व सेलू तालुक्यात सध्या निवडणूक आयोगाचा मतदार नावनोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे. त्या मतदार याद्यांमध्ये जिंतूर व सेलू तालुक्यातील ज्या मुलांचे वय १४ वर्ष, १५ वर्ष, १६ वर्ष व १७ वर्ष आहे. अशा मुलांची नावे बोगस कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीमध्ये टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याच बरोबर जिंतूर, सेलू तालुक्यात व विशेषतः जिंतूर शहरात व ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून जे मतदार राहतात त्यांची नावे कमी करून वगळण्यात येत आहेत. काही राजकीय लोक अधिकाऱ्यावर दबाव टाकून, असे काम करत आहेत. अशा प्रकारची नवीन नावे, जी यादी प्रसिद्ध होईल त्यात ती येऊ नयेत. जी नावे अनेक वर्षांपासून मतदार यादीत आहेत ती नावे मतदार यादीतून वगळण्यात येऊ नयेत. बोगस नावे आढळल्यास तत्काळ बोगस मतदारांवर गुन्हे दाखल करून योग्य ती कार्यवाही करावी, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी विश्वनाथ राठोड, रामराव उबाळे, गणेशराव ईलग, दलमीर खान पठाण, अभिजीत भांबळे, राहुल घुले, ओम राठोड, मनोज राऊत आदींची उपस्थिती होती.
मतदाराचे वय शालेय दाखल्यावरील जन्म तारीखेप्रमाणे १८ वर्ष पूर्ण नसतांना, आधारकार्डावर छेडछाड करून वय वाढवून १४ ते १७ वर्षाच्या मुलांची नावे मतदारयादीत टाकली जात आहे. हे तत्काळ थांबले पाहिजे व अशी नावे यादीत प्रसिद्ध करू नयेत. तसेच अनेक वर्षांपासूनची मतदार यादीतून कमी केलेली नावे यादीत कायम ठेवावीत. – विजय भांबळे, माजी आमदार, जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघ
मतदारयादीत नाव नोंदणी करतांना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी केली जाते. सेलू, जिंतूर तालुक्यातील तक्रारी ९५ जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील. मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडून मतदारयादीत नाव नोंदणीचे काम चुकीच्या पद्धतीने होणार नाही. ते अधिक काळजीपूर्वक व काटेकोरपणे व्हावे. याची प्रशासनाकडून पूर्णतः दक्षता घेतली जात आहे. – रघुनाथ गावडे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, परभणी