आनंदी जीवनासाठी वास्तवात जगा
डॉ.संजय कळमकर यांचे प्रतिपादन, वसंत प्रतिष्ठानची व्याख्यानमाला
सेलू जि.परभणी : खोट्या प्रतिष्ठेपायी दुःखच वाट्याला येतात. म्हणून अभासी जगात प्रत्येकाने भानावर येऊन वास्तवात जगणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध विनोदी कथाकार डॉ.संजय कळमकर यांनी केले. माजी नगराध्यक्ष ॲड.वसंतराव खारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वसंत प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी (९ ऑगस्ट ) साई नाट्यगृहात आयोजित व्याख्यानात प्रा.डॉ.संजय कळमकर बोलत होते. ‘ जीवनातील आनंदाच्या वाटा ‘ या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, संयोजक महेश खारकर, ॲड.उमेश खारकर यांची उपस्थिती होती.
डॉ.संजय कळमकर म्हणाले, ” काळाबरोबर जीवनाभिमुख अभ्यासक्रम राबविण्यात यायला हवा. पुस्तक, वाचनापासून माणूस दूर गेल्यामुळे दुःख वाढत चालले आहे. आनंद सगळीकडे आहे. तो शोधायला हवा. दुःख व्यक्त करण्याच्या सवयीमुळे निराशाच पदरी पडते. आनंद दिल्याने तो वाढतो. समाधानाने जगणे महत्वाचे आहे. तरच जीवनातील आनंदाच्या वाटा खुल्या होतील.” प्रास्ताविक उद्योजक महेश खारकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुरेश हिवाळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले. ॲड.उमेश खारकर यांनी आभार मानले. व्याख्यानाला विविध क्षेत्रातील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.