विद्यापीठ आणि मी : प्राचार्य डी.आर.कुलकर्णी 

विद्यापीठ आणि मी : प्राचार्य डी.आर.कुलकर्णी 

२३ ऑगस्ट (शुक्रवार) रोजी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्थापनेचा ६६ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त सेलू् (जि.परभणी) येथील नूतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डी.आर.कुलकर्णी यांनी विद्यापीठ स्थापनेच्या अनुषंगाने आठवणींना उजाळा दिला आहे.

ला वाचनाची आवड असल्याने मी प्राचार्य म्हणून कार्यरत असताना, महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी आलेली पुस्तकं, महत्त्वाची संदर्भ ग्रंथ, नियतकालिकं इत्यादी माझ्याकडून हाताळली जात आणि काही वाचनात येत. शिस्तप्रिय प्राचार्य तसा वाचनप्रिय प्राचार्य असेही मला संबोधले जाऊ लागले. माझ्या सेवानिवृत्तीनंतर मी या सोयींपासून दुरावलो. परंतु, सेलूला सेवानिवृत्तीनंतर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेत कार्य करू लागलो. त्यामुळे पूर्वीसारखं नाही पण माझी वाचनाची तहान भागता येईल एवढे ग्रंथ नियतकालिकं हाताळता आली. माझ्या पत्नीच्या निधनानंतर मला एकट्याला सेलूला राहणे कठीण होऊ लागले. त्यामुळे मागील सात-आठ वर्षापासून औरंगाबादला माझ्या मोठ्या मुलाकडे स्थिरावलो. इतर दोन मुलं आणि मुलीकडे अधूनमधून जात असे. पण मागील दोन-तीन वर्षापासून गुडघेदुखीचा त्रास वाढत गेला आणि आता स्वतंत्रपणे चालणं जमेना. कोरोना साथीनंतर माणसाचे बाहेर जाणं कमी झाले. शहरी जीवनात तर कामाशिवाय कोणी कोणाला बोलत नाही. भेटत नाही. माझा वाचनाचा छंद लक्षात घेऊन मोठ्या मुलाने माझ्यासाठी चार-पाच दैनिकं घेण्यास प्रारंभ केला. माझी वैचारिक जडणघडण विचारात घेता, मी ‘साधने’ सारखे दर्जेदार आणि वैचारिक खाद्य पुरविणारे साप्ताहिक आणि ‘साम्य योगसाधने’ सारखे विधायक विचार मांडणारे पाक्षिक नियमित वाचतो. वाढत्या वयामुळे शरीर प्रकृती आणि अवयवे फार काळ वाचन करू देत नाहीत. तरी ग्रंथ आणि काही नियतकालिकचं मित्र बनले. या मर्यादित वाचनाने दुधाची तहान ताकावर भागवतो. असो.
माझ्या विद्यार्थीदशेपासूनच मी अभ्यासाचा किडा म्हणून ओळखला जातो. त्यात प्राध्यापक म्हणून काम करू लागलो. त्यामुळे वाचनाचा छंद सवयीत बदलला. म्हणून आतापर्यंत आयुष्याची वाटचाल चालू आहे. जुने मित्र हितचिंतक ग्रंथ पुस्तक भेट म्हणून देतात. त्यात अनेकांचे गौरव ग्रंथ, स्मृती ग्रंथ संग्रही जमले. मधूनमधून असे ग्रंथ वाचित असतो. मला माझे विद्यार्थीदशेपासूनचे मित्र श्री शेषराव चव्हाण यांनी त्यांच्या दोन डझन प्रकाशित ग्रंथापैकी दोन-चार ग्रंथ मला भेट म्हणून दिले. त्यात “मराठवाडा विद्यापीठ ते संयुक्त राष्ट्र संघ” हा ग्रंथ मला विशेष आवडला. त्यांचं सर्व लिखाण इंग्रजी भाषेत असून विद्यापीठातील एक अधिकारी म्हणून त्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाची कल्पना होती. परंतु स्वतःचे विद्यापीठातील अनुभव लिहीत असताना त्यातून या विद्यापीठाचा कारभार कसा चालला होता हे लक्षात आले.अप्रत्यक्षपणे विद्यापीठाचा इतिहास थोड्या वेगळ्या पद्धतीने समोर आला.

मी विद्यापीठाच्या सेवात केव्हांही नव्हतो. परंतु विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचा अनुभव मला १९५८ पासून म्हणजे त्याच्या स्थापनेपासून घेता आला. कारण मी १९५६ पासून तीन वर्ष शासकीय महाविद्यालयात हंगामी व्याख्याता म्हणून कार्यरत होतो. मराठवाडा विभाग तत्कालीन मुंबई राज्यात राज्य पुनर्रचनेमुळे सामील झाला. द्वैभाषिक मुंबई राज्य – मराठी आणि गुजराती भाषिक अस्तित्वास आले. त्या काळची प्रशासकीय व्यवस्था डळमळीत होती. कारण ”संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” ही चळवळ उभी राहिली आणि वाढतच गेली. या जनचळवळीची दखल भारत सरकारला घ्यावी लागली आणि एक मे १९६० या दिवशी महाराष्ट्र निर्माण झाला. मराठी भाषिकांची फार दिवसाची भाषावार प्रांतरचनेची मागणी मान्य झाली. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची हस्ते या नव्या मराठी आणि गुजराती भाषिकांची दोन वेगवेगळी राज्ये अस्तित्वात आली.

त्कालीन मुंबई राज्य सरकारने एप्रिल १९५७ ला मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसाठी एका समितीची नेमणूक केली. हैदराबाद राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री एस. एम. पलनीटकर हे या समितीचे अध्यक्ष व इतर नऊ सभासदांची नियुक्ती झाली. मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ.एस.आर.डोंगरेकरी जे त्यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव होते. यांचा यात समावेश होता. या समितीने तीन-चार बैठकांत विद्यापीठ स्थापनेच्या प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबर १९५७ ला आपला अहवाल शासनाला सादर केला. मार्च १९५८ ला तत्कालीन शिक्षण मंत्री श्री हितेंद्र देसाई यांनी मुंबई विधान परिषदेत हे विधेयक सादर केले. दोन्ही सभागृहांनी हे विधेयक संमत केल्यानंतर श्री प्रकाश हे तत्कालीन राज्यपाल होते. त्यांची संमती ५ मे १९५८ ला प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठ कायद्यात त्याचे रूपांतर झाले. तेव्हा मराठवाड्याच्या पाचही जिल्ह्यांसाठी विद्यापीठ अस्तित्वात आले. सुमारे ६७० एकर जमीन असलेले हे विद्यापीठ निसर्गरम्य जागी स्थापन झाले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे हस्ते या विद्यापीठाचे २३ ऑगस्ट १९५८ रोजी रितसर उद्घाटन झाले. मोठा जनसमुदाय आणि तत्कालीन शिक्षण मंत्री हितेंद्र देसाई यांच्या साक्षीने हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
५ मे या दिवशी आमचा विवाह संपन्न झाला. या विद्यापीठाच्या निर्मितीचा शुभारंभ या दिवशी झाला आणि अवघ्या चार महिन्यात या विद्यापीठाची स्थापना झाली. माझ्या कौटुंबिक दृष्टीने आणि मराठवाड्यात स्वतंत्र विद्यापीठ अस्तित्वात येणे हा माझ्या दृष्टीने भावनात्मक दिवस ठरला. म्हणून ५ मे आणि २३ ऑगस्ट १ ९५८ या तारखांना माझ्या स्मरणात स्थान कायमची झाले. मी १९५६ ते १९६८ पर्यंत जालन्याच्या जीईएस कॉलेजमध्ये प्राध्यापक, विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य म्हणून या विद्यापीठात मला बरेच काही शिकता आले. प्रभारी प्राचार्य म्हणून विद्यापीठाच्या कोर्ट ( विधीसभा), विद्या परिषद, अभ्यास मंडळ, विद्या शाखा, विविध समित्या, कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक इत्यादींचा अनुभव आला त्याकाळी श्री शेषराव चव्हाण या विद्यापीठात विविध अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यामुळे पूर्वीच्या मैत्रीला उजाळा मिळाला. 15 मे १९६८ ला मी सेलू येथे नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य पद स्वीकारले. तेव्हापासून ते मी सेवेतून निवृत्त होईपर्यंत म्हणजे एप्रिल १९९३ पर्यंत माझा या विद्यापीठाशी आणि विविध पदाधिकाऱ्यांशी ऋणानुबंध जुळला. या विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेडला त्याच वेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठची स्थापना झाली. संस्थाचालक म्हणून नांदेड येथील विद्यापीठाशी काही काळ संबंध आला. आता वाढत्या वयामुळे बाहेर जाणे-येणे आणि सार्वजनिक उपक्रमात सहभागी होणे बंद झाले आहे. असो, मराठवाडा विद्यापीठाशी जवळजवळ तीन दशकाहून अधिक काळ संबंध आला म्हणूनच लेखात मराठवाडा विद्यापीठ असे उल्लेख आले आहेत. आता ”डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” हे मराठवाड्यातच नव्हे महाराष्ट्र आणि देशात घटनातज्ञांच्या नावाने ओळखले जाते.
विद्यापीठास वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

– डी.आर.कुलकर्णी
माजी प्राचार्य आणि संस्था चिटणीस, नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू जि.परभणी

Please Share

One thought on “विद्यापीठ आणि मी : प्राचार्य डी.आर.कुलकर्णी 

  1. सर्वात बकवास विद्यापीठ आहे हे मुलांचे दोन दोन तीन वर्ष झाले ग्रॅज्युएशन होऊन तरी पण तुम्ही डिग्री देऊ शकत नाही लायकी नाही तर बंद करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!