पोरगं मोबाईल खेळत होतं, भलं मोठ्ठं…
कविवर्य नारायण सुर्वे यांना काव्यमैफिलीतून अभिवादन, सेलूतील कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम
सेलू : ” काल आपल्या गावातलं पोरगं मोबाईल खेळत होतं, भलं मोठं आजगर, त्याच्या मांडीवर बसलं होतं.’ या कवी प्रभु शिंदे यांनी सादर केलेल्या कवितांसह स्थानिक कवी, कवयित्रींनी बहारदार कविता सादर करीत कविवर्य नारायण सुर्वे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले.
येथील कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी, १८ ऑगस्ट रोजी ही काव्य मैफिल आयोजिण्यात आली होती. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.के.डी.वाघमारे होते. प्रेक्षाताई भांबळे यांच्या हस्ते कविवर्य नारायण सुर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा आयोजक अशोक काकडे, सर्जेराव लहाने, डॉ,निर्मला पद्मावत, करूणा बागले. प्रा.राजाराम झोडगे, दिलीप डासाळकर आदींची उपस्थिती होती.
माधव गव्हाणे यांनी ‘ इंडिया सहज जाऊन पोहोचला मंगळा सहित चंद्रावर, आम्हाला ईतक्या सहज पोहचता येत नाही आरोग्य केंद्रावर ‘ या कवितेतून वास्तवाची जाणीव करुन दिली.गौतम सूर्यवंशी यांनी ‘धर्म,पंथ, अन भेद नको: समानता ही हवी एकसंघ, या भारताची ओळख देऊ नवी, भेद सारे विसरूनी, आता समरस होऊ चला ‘ या रचनेतून समताभाव जागविला. अश्विनी संजय विटेकर या गझलकार दाम्पत्याच्या जुगलबंदीने रसिक श्रोत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. अश्विनी विटेकर यांनी,’ तुझ्या आठवांचा पहारा वगैरे, किती गोड हा कोंडमारा वगैरे.’ तर संजय विटेकर यांनी , ‘ घेवून टाक आता वापस मिठी तुझी तू , ठेवून मी कुणाचे उपकार घेत नाही.’ ही गझल सादर केली. डॉ. शरद ठाकर यांनी ‘तुझ्या रुपाने पडल माझ्या नशिबी चांदणं, डॉ.जयश्री सोन्नेकर यांनी ‘ पंथ माझा जातही माहीत नाही, फक्त मी माणूस, याचे भान आहे.’ संध्या फुलपगार यांनी ‘ मी कशाला बरे कुणाची चाकरी करावी म्हणते, अर्धीच पण हक्काची भाकरी करावी म्हणते. सुमिता सबनिस यांनी, ‘ पोरावानी जपतोया ,जसं पोटचाच पोर, बाप मव्हा रातदिस ,कापसाच्या मागम्होर.’ ही कविता सादर केली. तर हरिष कवडे यांनी, ‘ मंत्र्याचा लाल दिवा, गाव सार पेटवून गेला, बाप-लेक, चुलते-पुतणे, अशी रक्ताची नाती गोठवुन गेला. ‘ या कवितेतून राजकीय वास्तव मांडले. कवी डॉ.अशोक पाठक, दिलीप डासाळकर, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, शैलजा वसेकर, करूणा बागले, डॉ. राजाराम झोडगे, संभाजी रोडगे, शुक्राचार्य शिंदे, दिलीप दौड, डॉ.निर्मला पद्मावत, राम गायकवाड यांनी आपापल्या कविता सादरीकरणातून रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. रसिकांनी काव्य मैफिलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रास्ताविक अशोक काकडे यांनी केले. सूत्रसंचालन कवी सुरेश हिवाळे यांनी केले, तर आभार कॉम्रेड अशोक उफाडे यांनी मानले. काव्य मैफिलीसाठी संतोष कुलकर्णी, मोहन बोराडे, किशोर कटारे, संदीप काष्टे, अरविंद लहाने, शिवाजी गजमल यांनी पुढाकार घेतला.