परभणीमध्ये शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
समृद्धी महामार्गाच्या जमीनीला बाजारभावाप्रमाणे मोबदला द्या
परभणी : जालना – नांदेड समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने संपादित जमिनीला चालू बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन भूमीवर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. संघर्ष समितीचे उपाध्यक्ष रामेश्वर गाडेकर, बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोकनाना काकडे, अमृत शिंदे, रमेश माने, कालिदास आपेट आदींच्या नेतृत्वाखाली गुरुवारी, २२ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आंदोलन सुरू झाले. कालिदास आपेट, अशोक काकडे, रामेश्वर गाडेकर यांनी या वेळी विचार मांडले. समृद्धी महामार्गासाठी हुकुमशाही पद्धतीने होत असलेले भूसंपादन तत्काळ थांबवून परिशिष्ट १६ संयुक्त मोजणी ग्राह्य धरून फळबाग, विहीर यांचे मूल्यांकन झालेले कायम करण्यात यावे. जमिनीला चालू बाजार भावाप्रमाणे मोबदला द्यावा अशी आग्रही मागणी केली. याशिवाय समृद्धी महामार्ग जालना ते नांदेड शेतकऱ्यांना पुणे रिंग रोडच्या धर्तीवर मोबदला देण्यात यावा, फळबागांचे पहिले मूल्यांकन कायम करण्यात यावे, बेकायदेशीर मूल्यांकन प्रक्रिया तत्काळ थांबवावी आदी मागण्यांचा जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात समावेश आहे. आंदोलनात गणेश पाटील, गणेश मुंडे, बाळासाहेब गाडेकर, विजय खरात, अन्वर शेख, रघुनाथ टाके, सोनु खरात, बाळू गायकवाड आदींसह जालना ते नांदेड महामार्ग शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.