सेलूतील वीरशैव स्मशानभूमी अतिक्रमणाच्या विळख्यात
शिवा संघटनेचे तहसीलदारांना निवेदन, जागेच्या मोजणीची मागणी, आंदोलनाचा इशारा
सेलू : येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या गट नंबर ३३ मधिल २ एकर जागेवर आजुबाजूच्या जमिनधारकांनी अतिक्रमण केले असून या स्मशानभूमीच्या जागेची मोजणी करून द्यावी अशी मागणी अखिल भारतीय वीरशैव संघटना शाखा सेलूच्या वतीने तहसीलदारांना २२ ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, येथील वीरशैव समाजाच्या स्मशान भूमी साठी गट नंबर ३३ मध्ये २ एकर जागा आहे. या जागेचा उपयोग शहरातील वीरशैव बांधव अंत्यसंस्कारासाठी करतात, परंतु गत काही दिवसांपासून स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या जमिनधारक शेतकऱ्यांनी स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करून ती ताब्यात घेतली आहे. तसेच वालूर कडून येणाऱ्या रस्त्यावर देखील अतिक्रमण करून रस्ता देखील ताब्यात घेतला आहे. सद्यपरिस्थितीत शहरात वीरशैव लिंगायत समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उपलब्ध असलेली स्मशानभूमीची जागा दफनविधीसाठी अगोदरच कमी पडत आहे. त्यातच नाल्याचे पाणी स्मशान भूमीत येत असल्यामुळे सर्वत्र दलदल निर्माण झाली असून न.प.अंतर्गत गावातील कचरा देखील येथे टाकला जातआहे. त्यामुळे येथे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून मयताचा अंत्यविधी करण्यात अनंत अडचणी येत आहेत. ही गंभीर समस्या दूर करण्यासाठी गट क्रमांक ३३ मधिल २ एकर स्मशानभूमीची जागा मोजणी करून त्याला संरक्षक भिंत बांधून द्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर उपजिल्हाप्रमुख शिवकुमार नावाडे, तालुकाप्रमुख निजलिंगअप्पा तरवडगे, कैलास मलवडे, रामदास पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.