
औरंगाबाद खंडपीठाने फेटाळले अतिक्रमण धारकांचे अपील
सेलू : येथील श्री शंकरलिंग मंदिर परिसरातील, अतिक्रमित जमिनीवर राहात असलेल्या अतिक्रमणधारकांचे, जागेवर मालकी हक्क सांगणारे अपील, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावले. न्यायाधीश मंगेश स.पाटील यांनी २६ एप्रिल २०२२ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. शंकरलिंग मंदिर संस्थानचे अध्यक्ष अशोकअप्पा वाडकर यांनी सोमवारी (दोन मे) ही माहिती दिली.
अतिक्रमण धारकांच्या विरोधात परभणी जिल्हा न्यायालयाने दिलेला निकाल, योग्य व सकृतदर्शनी १९५० च्या कायद्यान्वये, बरोबर असल्याचे औरंगाबाद खंडपीठाने निकालामध्ये नमूद केले आहे. श्री शंकरलिंग मंदिर देवस्थान १९५० कायद्यान्वये नोंदणीकृत असून, देवस्थानच्या नांवे असलेल्या जमिनीवर व जागेवर मालकी हक्क सांगण्याचा अधिकार इतरांना राहात नाही. अन्य खंडपीठाने या संदर्भाने दिलेल्या निकालाचे उदाहारण देत, रखमाजी रामभाऊ गिरी, वसंत नाथोबा रोडगे, माणिक शामराव शिंदे, शाळीग्राम अप्पाराव रोडगे या अतिक्रमणधारकाचे अपील खंडपीठाने फेटाळून लावल्याचे वाडकर म्हणाले. देवस्थानच्या वतीने ॲड.मनीष त्रिपाठी (औरंगाबाद) यांनी बाजू मांडली. या निकालामुळे वीरशैव समाजाच्या देवस्थानच्या अंतर्गत असलेल्या, मंगल कार्यालयाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे वाडकर यांनी सांगितले. या वेळी कायदेविषयक सल्लागार ॲड.गिरीश साडेगांवकर, प्रा.मिलिंद झमकडे, शुभम महाजन, शाम राऊत, बालासाहेब सरकाळे, विश्वनाथ हुगे, पवन मिटकरी, शुभम सोळंके, गणेश चव्हाण, डॉ.दत्तात्रय मिटकर, राजेंद्रअप्पा नावाडे, सोमनाथ सोळंके, रामाप्पा तोडकर, महादेव आगजाळ आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
स्वामी परिवाराचेही अपील फेटाळले
श्री.मठ अय्या पेठमोहल्ला (श्री गुरु गंगाधर स्वामी मठ संस्थान ) या संस्थानात अतिक्रमण करून राहात असलेल्या, स्वामी परिवाराचे वारसा हक्काचे अपील उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच, २२ फेब्रुवारीला फेटाळले आहे. लवकरच या संदर्भाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष राजेंद्रअप्पा महाजन यांनी या वेळी दिली.