अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा
सेलू तालुका भारतीय जनता पक्षाचे तहसीलदारांना निवेदन
सेलू जि.परभणी : गेल्या दोन दिवसापासून सेलू तालुक्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच गावागावात, शहरात घरांची पडझड झाली आहे. पशुधन आणि शेतकी अवजारांचेही मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून लवकरात लवकर सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सेलू तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
या बाबत तहसीलदार शिवाजी मगर यांना मंगळवारी, तीन सप्टेंबररोजी निवेदन देण्यात आले. दोन दिवस सेलू तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बरीचशी शेती अजूनही पाण्याखालीच आहे. पिकांची खूप नुकसान झाले आहे. शेतातील पशुधन गाई, वासरू, जनावरे, शेळ्या, मेंढ्या पुरात वाहून गेल्या आहेत. ग्रामीण भागातील गावांमध्ये आणि सेलू शहरांमध्ये घरात पाणी घुसल्यामुळे घरांची पडझड झाली आहे. तसेच नदीनाल्याकाठच्या शेतजमीनी पूर्णपणे खरडून गेल्या आहेत. या नुकासानीचे दोन दिवसात तात्काळ पंचनामे करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री अर्जुन बोरुळ, तालुकाध्यक्ष दत्ता कदम, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, माजी सभापती रवि डासाळकर, शिवाहरी शेवाळे, कपिल फुलारी, भास्कर आबा पडघन, पांडू तात्या, अशोक शेलवाडीकर, सोळंके,अशोक ताठे, अजय डासाळकर, महेश टाक, प्रकाश गजमल, विकास ताठे, प्रकाश ताठे, संजय गटकळ, केदारेश्वर मोगल, संदीप घुगे, रामजी डक, सुंदर गाडेकर, गोविंद शर्मा,अमोल भोसले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.