पंचनाम्यांचे अहवाल प्राप्त होताच शेतकर्यांना मदत : मंत्री अनिल पाटील
परभणी, दि. ०९ : जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीन, कापूस आणि ऊस आदि पिकांसह कृषि साहित्य आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्यांचे अहवाल प्राप्त होताच शासनाकडून मदत देण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले. नांदेड, हिंगोलीनंतर परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित आहेरवाडी व माटेगाव येथील भागाची आज त्यांनी पाहणी केली. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य शासन अतिवृष्टी बाधित शेतक-यांच्या पाठीशी उभे असून, मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यांना अग्रिम देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टी बाधित शेतकर्यांना कृषि विभागाकडून पिक विमा मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पंचनाम्याच्या अहवालावरून आवश्यक निधीची वित्त विभागाकडे मागणी करता येणार आहे. गतवर्षी पिक विमा भरल्यानंतरही कंपन्यांनी शेतक-यांना भरपाई दिली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्र्यांनी याबाबत नुकताच आढावा घेतला आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन शेतक-यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. आहेरवाडी, एरंडेश्वर, कात्नेश्वर, लक्ष्मीनगर- पिंपळगाव, नावकी आणि माटेगाव येथील शेतकर्यांनी नुकसानीची त्यांना माहिती दिली.