अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या; अन्यथा…
आमदार बच्चू कडू यांचा सरकारला खणखणीत इशारा
अतिवृष्टीग्रस्त भागाची छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांनी केली एकत्रित पाहणी
परभणी : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आज सोमवारी, ९ सप्टेंबर रोजी प्रहार जनशक्तीचे पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे व इतर घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रितरित्या पाहणी केली. येणाऱ्या सात दिवसांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून सरकारने तत्काळ मदत दिली नाही, तर पुन्हा एकदा परभणीमध्ये येऊन प्रचंड असा मोर्चा काढू, असा इशारा देण्यात आला.
मानवत तालुक्यातील रामेटाकळी आणि वझुर या गावात त्यांनी भेट दिली. यावेळी शेतकर्यांनी त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली तसेच प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी या सर्वांना तिन्ही नेत्यांनी चांगलेच धारेवर धरले. तर एकीकडे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झालेले असताना दुसरीकडे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर तिन्ही नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला. वझूर गावातील ग्रामस्थ, शेतकरी बांधवांनी यावेळी आपल्या व्यथा या नेतेमंडळींसमोर मांडल्या. तसेच पाहणी करायला शेतात गेल्यानंतर काही शेतकर्यांच्या अश्रूंचा बांध देखील फुटला. तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे शेतकर्यांना धीर दिला. यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष माधव पाटील देवसरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधक्ष किशोर ढगे पाटील, अंकुश कदम, आप्पासाहेब कुढेकर, प्रहार पक्षाचे शिवलिंग बोधने, भारतीय जवान किसान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.