गणेशोत्सव व्याख्यानमाला : आधुनिकतेसोबत वैचारिकदृष्ट्या संपन्नता महत्वाची
उद्योजक नीलेश बिनायके यांचे प्रतिपादन, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडले परिसंवादातून विचार
सेलू/परभणी : अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्र, मानवी जीवन व्यापून टाकले आहे. काळाबरोबर स्वतःला बदलावे लागेल. तरच मानव प्रगती साध्य करू शकतो. परंतु आधुनिकता ही एका कालचक्राप्रमाणे पुर्नरावृतीत आहे. ती स्वीकारत असतांना प्रत्येकाला मानसिक, अध्यात्मिक आणि वैचारिकदृष्ट्या संपन्नता वाढविणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उद्योजक नीलेश बिनायके यांनी केले.
सेलू येथील ६३ व्या गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पा अंतर्गत शनिवारी, १४ सप्टेंबर रोजी ” आमच्या जीवनातील आधुनिकता (नवीन तंत्रज्ञान) ” या विषयावर परिसंवाद झाला. समारोपप्रसंगी श्री.बिनायके बोलत होते. याप्रसंगी प्रभाकर चव्हाळ (शेती), इंजिनिअर बी.एस.कोलते ( बांधकाम), प्राचार्य डॉ.उत्तम राठोड (शिक्षण), कावेरी भातलवंडे-सराफ ( बॅंकिंग), डॉ.अनिकेत जोगदंड ( वैद्यकीय), अविनाश बिहाणी (व्यापार), विलास पौळ (उद्योग), मोहन बोराडे ( पत्रकारिता) यांनी परिसंवादात सहभाग घेतला आणि आपापल्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आलेली व्यवहार, उपचार, कार्य, कौशल्य, शिक्षण सुलभता तसेच विविध स्तरावर काय काय बदल झाले ? आणि यामुळे मानवी जीवनातील बदल आणि भविष्यवेधी जीवन याची अभ्यासपूर्ण ठळकपणे मांडणी केली. सूत्रसंचालन डॉ.गंगाधर गळगे यांनी केले. धनंजय भागवत यांनी आभार मानले. नारायण इक्कर यांनी संयोजन केले. कार्यक्रमाला श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.