सेलूमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
सेलू/परभणी : शहरातील पोस्ट ऑफीस रोडवरील चौकातील एका सोन्याचा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानातील सोने व चांदीच्या वस्तू चोरून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना शुक्रवारी, २० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
एकाच दुचाकीवर चार जण बसवून नूतन रोडवरील संजय भातलंवडे यांच्या घरासमोरील काळ्या रंगाची दुचाकी चोरून दोन दुचाकीवर बसवून चोरांनी क्रांती चौकाच्या दिशेने मोर्चा वळविला. शुक्रवारी पहाटे २ वाजता क्रांती चौकात काही अंतरावरील वरद ज्वेलर्स या दुकानाचे एका बाजूचे कुलूप तोडून शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. दुकानातील १५ हजार रूपयाचे चांदीचे जोडवे, १६ हजार रूपयाचे सोन्याची (नथ) असा एकूण ३१ हजार रूपयाचा मुद्देमाल चोरांनी चोरी करून पोबारा केला. तर दुसऱ्या एका घटनेत ३५ हजार रूपयांची दुचाकी असा एकूण ६६ हजार रूपयाचा मुद्देमाल चोरी झाल्याची फिर्याद संजय शेडूते यांनी सेलू पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून श्वान पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण करणयात आले. भुरट्या चोरांचा तपासासाठी पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरविले असून चोरांचा तपासासाठी परभणी येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक कामाला लागले आहे.
गुगळी धामणगावातून दुचाकी पळविली
तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील रमेश काटकर यांच्या घरासमोरून नवीन दुचाकी चोरट्यांनी पळवली. यावरूनच एकाच रात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ करून पोबारा केल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
सोने-चांदीचे दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे चोर कैद झाले असून दुकानातील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला, त्यानंतर इतर ठिकाणी काही मिळते का? यांची चांगली झडती घेवून मिळालेला माल खिशात घातला, तसेच बाहेरून काही तरी इशारा मिळताच चोरांनी धूम ठोकली. चोरी करण्यासाठी दुकानात तिघे जण घुसले होते. अन्य काही जण बाहेर असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. चोरांच्या हातात लोखंडी सळई, तो अंगाने तरूण सडपातळ असून काळा पोषाख परिधान केल्याचे दुकानातील सीसीटीव्ही चित्रिकरणात दिसत आहे. चोरीच्या घटनेचे चित्रिकरण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक चोरीचा घटनेत चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असतांना सुध्दा पोलीस प्रशासनाला चोरट्याचा तपास लागत नसेल तर हेच मोठं कुर्भाग्य म्हणावे लागेल, अशी चर्चा होत आहे.