मराठवाड्यामध्ये ३० जागा जिंका : अमित शहांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
छत्रपती संभाजीनगर : विविध आंदोलन, ऊसाला भाव आदी प्रश्नासंदर्भातची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांवर सोडून द्या, कार्यकत्यांनी दिलेल्या रणनितीप्रमाणे काम करावे, एका कार्यकर्त्यांने किमान तीन कुटुंबातील मतदारांचे मतदान करून घ्यावे, असा कानमंत्र भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकत्यांना दिला. मराठवाड्यातील ३० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प करा, असा संदेशदेखील त्यांनी मराठवाडास्तरीय बैठकीत बोलताना दिल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा मराठवाडास्तरीय संवाद बैठक मंगळवारी एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते शिवप्रकाश, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, अशोक चव्हाण, अतुल सावे, अजित गोपछडे, संजय केणेकर आदी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ‘महाराष्ट्राची निवडणूक ही संपूर्ण देशावर प्रभाव टाकणारी आहे. आजपासून निवडणुका सुरू झाल्या असे समजून कामाला लागा. रणनीतीने निवडणुकीला सामोरे जा. आंदोलनाची चिंता करू नका, ते सरकार व पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी पाहतील, पदाधिकारी, कार्यकत्यांनी मते कसे वाढतील, यावर भर द्यावा, दसरा ते दिवाळीपर्यंत प्रत्येक बूथपर्यंत मतदारांशी संपर्क साधा.’
‘योजना जनतेपर्यंत न्या’ ‘लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात अपपेक्षित निकाल लागला. वेगवेगळे पद्धतीने अनेक फॅक्टर एकत्रित आले होते. फेक नरेटिव्ह पसरविण्यात आले होते. आता चित्र वेगळे आहे. लाडकी बहीणसह विविध कल्याणकारी योजनांमुळे सकारात्मकता निर्माण झाली आहे,’ असे या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ‘आत्मविश्वासाने मैदान उतारा. विरोधकांना उत्तर देण्याची तयारी ठेवा,’ असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. या वेळी दानवे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आदी नेत्यांनी देखील कार्यकत्यांना मार्गदर्शन केले. विदर्भात भाजपचे ‘मिशन ४५’ नागपूर : ‘लोकसभा निवडणुकीतील निकालाने निराश होण्याची गरज नाही. विदर्भ सत्तेचा मार्ग आहे. एक दशकापूर्वी ४२ जागांचा गाठलेला पल्ला ध्येय नाही. यंदा ४५ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवा. मित्रपक्षाच्या विजयाविना आपण सत्तेत येऊ शकत नाही. शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘घड्याळ’ चिन्ह असले, तरी ‘कमळ’ समजून काम करावे,’ अशी स्पष्ट सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
राज्यातील जागा वाटपाबद्दल चर्चा ? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मंगळवारी छत्रपती संभाजीनगरात रात्री उशिरा राज्यातील नेत्यांशी जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचे समजते. शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीतील रणनीतीवर मंथन झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
CR- Mata