शिक्षकांच्या महाआक्रोश मोर्चाने परभणी दणाणले
विविध मागण्यांसाठी शिक्षकांची जोरदार घोषणाबाजी
परभणी : शाळा आणि शिक्षणाच्या संदर्भात सरकारने योग्य निर्णयांची अंमलबजावणी करावी, याकरिता सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये जिल्हाभरातून शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्चादरम्यान विविध मागण्यांचे फलक हाती धरीत जोरदार घोषणाबाजीने परभणी शहर दणाणून गेले.
शनिवार बाजार मैदानापासून मोर्चाला सुरूवात झाली. अशोक रसाळ, रणजित काकडे, परमेश्वर जाधव, बी.एम.भांगे, दिगंबर मोरे, किशनराव इदगे, वसंतराव इंगोले, दीपक पंडित, रवि लोहट, सोपानराव बने, गजानन सोळंके आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलनस्थळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. सरकारी शाळेतील विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने शिक्षकांची अट पूर्ववत ठेवावी. द्विशिक्षक शाळेमध्ये एक शिक्षक कमी करून कंत्राटी शिक्षक भरती करू नये, १ नोव्हेंबर २००५ पासून शिक्षक सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ऑनलाइनची कामे नकोत, शालेय पोषण आहार विशेष यंत्रणेमार्फत द्यावा, विशेष निवडश्रेणी सर्व शिक्षकांना देण्यात यावी, शिक्षकांना शिकवू द्यावे आणि विद्यार्थ्यांना शिकू द्यावे, आदी प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन त्या तातडीने मंजूर कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. सभेचे सूत्रसंचालन शिरीष लोहट यांनी केले. अरुण चव्हाळ यांनी आभार मानले. मोर्चासाठी प्रा.किरण सोनटक्के, सुनील काकडे, सिबगत उल्लाह खान, अनंता गरुड, प्रभाकर सिरसाट, कविता पौळ, माधव सोनटक्के, उषा लोहट, गंगा बाकले आदींसह पदाधिकारी, शिक्षकांनी पुढाकार घेतला. मोर्चामध्ये जुनी पेन्शन संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, परभणी जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक परिषद, शिक्षणमहर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक समिती, संघशक्ती महिला आघाडी, अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ आदी संघटनांनी सहभाग घेतला.
अनेक शिक्षकांच्या किरकोळ रजा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे भवितव्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिक्षकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने सरकराचे लक्ष वेधण्यासाठी सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने परभणी येथे बुधवारी, २५ सप्टेंबररोजी आयोजित महामोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शिक्षक बुधवारी किरकोळ रजेवर होते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील शालेय व्यवस्थापन विस्कळित झाले होते. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी शाळा भरल्याच नसल्याचे चित्र होते.