(कै) अण्णासाहेब काकडे संस्थेचा उपक्रम
सेलू : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या परभणी जिल्हा प्रभारी बीके अर्चना बहेन, सविता बहेन यांनी, सेलू (जि.परभणी) तालुक्यातील कवडधन ग्रामस्थांशी मंगळवारी (तीन मे) मनमोकळा संवाद साधला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, कवडधन येथील (कै) अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेतर्फे मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता ‘स्नेह संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, बीके अर्चना बहेन, सेलू केंद्राच्या संचालिका बीके सविता बहेन, बीके राधा बहेन, बीके रचना बहेन, संतोष भाई, विक्रम भाई, सरपंच शांताबाई थोरात, प्रसाद काकडे, काशिनाथ काकडे, उद्धव काकडे, बाबासाहेब हेलसकर, राधाकिशन महाराज हिस्सीकर, किशोर कटारे आदींची उपस्थिती होती.

या वेळी अर्चना बहेनजी म्हणाल्या, ” प्रत्येकाने अंतर्मनात साचलेला क्रोध, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, मत्सर आदी विकारांचा कचरा साफ केला पाहिजे. त्यासाठी निर्मळ मन, बुद्धीने प्रत्येक कर्म ईश्वराची आठवण ठेवून करणे आवश्यक आहे. ब्रह्माकुमारी विद्यालयात राजयोगाच्या माध्यमातून हे ईश्वरीय ज्ञान, मोफत दिले जाते. वेळ काढून हे ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा.”
सविता बहेनजी म्हणाल्या, ” आपापसात स्नेह, आपुलकी, नम्रता, सहनशीलता, त्याग आदी गुणांची जपणुक करण्याची, ते टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वार्थी भावनेच्या जागी अध्यात्मिक, ईश्वरीय ज्ञान संपादन केले पाहिजे. ज्ञानातूनच सशक्त समाज निर्मिती शक्य आहे.”
प्रत्येकाला आधी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याचे ज्ञान अतिशय सोप्या पद्धतीने ब्रह्माकुमारी परिवारामध्ये दिले जात आहे. याचा लाभ गावातील; तसेच सेलू तालुक्यातील सर्व महिला, नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अशोक काकडे यांनी या वेळी केले. बीके राधा बहेन यांनी ब्रह्माकुमारी विद्यालयाचा परिचय दिला. सूत्रसंचालन बाबासाहेब हेलसकर यांनी केले. कार्यक्रमासाठी विजय काकडे, वरद काकडे, सुंदरराव काकडे, हरिभाऊ काकडे, सतीश थटवले, अशोकराव काकडे, भारती काकडे, गंगुबाई काकडे, बापूराव काकडे, नारायण जाधव, सिद्धेश्वर शिंदे, हर्षद काकडे आदींसह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.
