संत कबीरांनी माणुसकीचे तत्वज्ञान जगाला दिले : डॉ.गंगाधर गळगे
एक दिवस एक पुस्तक : स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात २२ वे पुष्प उत्साहात
सेलू : संत कबीर यांनी आपल्या दोह्यांमधून विषमता, अंधश्रद्धेवर प्रहार केला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे तत्वज्ञान दिले. असे प्रतिपादन डॉ. गंगाधर गळगे यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी -मराठी ग्रंथालय आयोजित एक दिवस एक पुस्तक उपक्रमाचे २२ वे पुष्प शनिवार, २८ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ.गंगाधर गळगे यांनी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नाटककार भीष्म साहनी यांच्या ‘कबिरा खडा बजार में ‘ या नाटकृतीचे अंतरंग उलगडले. अध्यक्षस्थानी पुष्पा काला होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून क्षमा नीलेश बिनायके यांची उपस्थिती होती. डॉ.गंगाधर गळगे म्हणाले की, ‘ पद्मभूषण भीष्म साहनी यांनी लिहिलेले ‘ कबिरा खडा बाजार में ‘ हे तीन अंकी नाटक आहे. ते आजही संगीत नाटक, पथनाट्याच्या स्वरूपात कुठे ना कुठे सादर होते. समाजात प्रेम, समता, बंधुता कबीराने रूजविली. अन्यायाचा प्रतिकार करायला शिकविले. ‘ असेही ते म्हणाले.
क्षमा निलेश बिनायके यांनी आपल्या मनोगतात संत कबीर यांच्या विविध दोह्यांचा दाखला दिला. कबीरांनी जीवनातील ताणतणाव, चिंता दूर करण्याचे सुत्र सांगितले. जीवन ही कला आहे. तेव्हा सर्वांना सोबत घेऊन आनंदाने जगले पाहिजे. हा मानवतावादी विचार संत कबीरांनी सांगितला. ‘ असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी विद्यावाचस्पती पदवी बहाल करण्यात आल्याबद्दल डॉ. सुरेश हिवाळे, कांचन हिवाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.रवी कदम यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर मुळावेकर, सविता पल्लेवाड, रुपाली काला, लिना काला, शोभा बिनायके, कीर्ती बिनायके, आरती बिनायके, कोमल काला, सपना काला, डॉ.शरद ठाकर, बाळू बुधवंत, सुभाष मोहकरे, रघुनाथ देशमुख, शिवाजी बोचरे, आनंद बाहेती आदींसह श्रोत्यांची उपस्थिती होती.