‘येलदरी’ चा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर
तीन जिल्ह्यांतील सिंचनाला लाभ; २५० गावांचा पाणी प्रश्न मार्गी
सेलू/परभणी : अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या आणि मराठवाड्यासाठी सुजलाम् सुफलाम् ठरलेल्या पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी (ता.जिंतूर जि.परभणी) धरणात रविवारी, २९ सप्टेंबर रोजी ९२.४६ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील ६० हजार हेक्टरवरील कृषी सिंचनासह औद्योगिक व घरगुती वापरासाठी पाणी घेणाऱ्या महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतीचा पुढील वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या साठ्यामुळे आगामी काळात जलविद्युत निर्मिती केंद्र कार्यान्वित होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
एकूण दहा दरवाजे असलेल्या येलदरी धरणाची पाणी पातळी रविवारी दुपारी एक वाजता ४६१.१७० मीटरवर पोहोचली. साठवण क्षमता ८७३.४५१ दलघमी असून जिवंत पाणीसाठा ७४८.७७४ दलघमी (९२.४६ टक्के) उपलब्ध झाला आहे. येलदरीतून सोडलेले पाणी सेनगाव तालुक्यात चिंचखेडा व जिंतूर तालुक्यातील घडोळी, खोलगाडगा येथील तीन कोल्हापुरी बंधाऱ्यातून येलदरी येथील जलविद्युत केंद्राच्या वीजनिर्मितीच्या तीन संचांमधून पुढे सिद्धेश्वर धरणात नेले जाते. सिद्धेश्वर धरणातून या पाण्याचे नियोजन करण्यात येते. येलदरीतून सोडलेल्या पाण्यामुळे शेतीसह तीन जिल्ह्यातील २५० हून अधिक गावांना पाणी मिळते. नदीपात्रात सोडलेल्या पाण्यावर वीज निर्मिती होत असल्याने महावितरण कंपनीला मोठा फायदा होतो. येलदरीतील पाण्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पिकेही घेता येतात. यावर्षी सुरुवातीला पावसाने विशेष हजेरी न लावल्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येलदरीत फारसे पाणी उपलब्ध झाले नव्हते. गतवर्षी धरणात ६१ टक्के एवढा पाणीसाठा होता. रब्बी व उन्हाळी हंगामात पाण्याच्या वापराअंती या धरणात २७ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये येलदरीसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली. धरणाच्या वरील भागातील खडकपूर्णा धरण आणि धरणाखालील सिद्धेश्वर धरणही शंभर टक्के भरले. त्यामुळे येलदरी धरणात ९२.४६ टक्के एवढा साठा उपलब्ध झाला आहे. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक पाहता धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.
जलविद्युत निर्मितीलाही वाव : येलदरी धरणावर उभारण्यात आलेल्या साडेबावीस मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत केंद्रातील तीन संचांमधून वीज निर्मिती कार्यान्वित होण्यास वाव मिळणार आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध करावे लागते, त्यावेळी ‘येलदरी’तील जलविद्युत केंद्र सुरू होते. पाण्याचे नियोजन जलसंपदा विभाग करत असून, जानेवारी ते एप्रिल या महिन्यांमध्ये पाण्याचे नियोजन केल्यानंतर जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मितीद्वारे नदीपात्रात पाणी सोडले जाते. त्यामुळे येणाऱ्या काळात जलविद्युत केंद्र सुरू होणार आहे. वीजनिर्मिती केंद्र सुरू झाल्यास ऐन उन्हाळ्यात गरजेच्या वेळी ऊर्जा विभागास वीजनिर्मितीचे सहकार्य लाभत असते. राज्याच्या तिजोरीतदेखील भर पडते.