हलक्यात घेऊ नका, सोडणार नाही, धडा शिकवा, हिशेब घेणार, उलथवून टाकणार
दसरा मेळाव्यातून इशाऱ्यांचे बाण
मुूंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, भाजपच्या पंकजा मुंडे तसेच मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ठिकठिकाणी घेतलेल्या दसरा मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधतांना, हलक्यात घेऊ नका, सोडणार नाही, धडा शिकवा, हिशेब घेणार, उलथून टाकणार अशा भाषेत इशाऱ्यांचे बाण सोडले.
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय कोणालाही सोडणार नाही…उद्धव ठाकरे
मुंबई : मी जिवंत असेपर्यंत महाराष्ट्र मोदी-शाह-अदानींचा होऊ देणार नाही. तसेच राज्यातील महायुती सरकारने शेवटच्या दिवसात जनतेच्या मुळावर येणारे जे निर्णय घेतले ते आमचे सरकार येताच रद्द केले जातील, दोन महिने थांबा कोणालाही सोडणार नाही, असा इशारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शिवाजी पार्कवरील पक्षाच्या दसरा मेळाव्यात दिला. ११ दिवसात महायुती सरकारने १६०० निर्णय घेतले. त्यातील अनेक मी रद्द करणार. बिल्डरांचे, विकासकांचे खिसे भरणारे निर्णय रद्द करणार, अधिकाऱ्यांना मी सांगतो, त्यांना अन् तुम्हालाही जेलमध्ये टाकू. मुंबई महापालिकेच्या तीन लाख कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. कंत्राटदारांच्या घश्यात पैसा टाकला जात आहे, त्यांची यादी घेऊन सत्ता येताच जेलमध्ये टाकू. सिमेंट रस्त्यांमध्ये खडी टाकणारे कोण याची चौकशी करणार, गावठाणांमधील अकृषक कर रद्द करण्याचा सरकारचा निर्णय शिंदेंनी मित्रांसाठी घेतला, दोन महिने थांबा, आमचे सरकार येऊ द्या, असे सगळे निर्णय रद्द करू असे ते म्हणाले. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे पहिल्यांदाच भाषण झाले. रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे व्यासपीठासमोर बसले होते.
प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांची मंदिरे : सरकार येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांची मंदिरे • आपले सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यात येतील असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. जे शिवरायंच्या मंदिरांना विरोध करतील त्यांना महाराष्ट्र बघून घेईल. शिवरायांची मंदिरे बांधायची नाहीत तर मोदींची बांधायची का? जय श्रीरामपेक्षाही मोठ्याने आम्ही ‘जय शिवराय म्हणणार. महायुती सरकारने शिवरायांच्या पुतळ्ळ्यात पैसे खाल्ले, तरीही त्यांना शिवराय मत मिळवायचे यंत्र वाटते, अशी टीका त्यांनी केली.
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : आपले सरकार आले तेव्हा हे सरकार १५ दिवसात पडेल, एका महिन्यात पडेल सहा महिन्यात पडेल, अशी टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे पुरून उरला. जनतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने घासून नाही तर ठासून आपण दोन वर्ष पूर्ण केली. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंद दिर्धेचा चेला आहे, मला हलक्यात घेऊ नका, मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दिला.
आझाद मैदानावर शिंदेसेनेचा तिसरा दसरा मेळावा शनिवारी पार पडला त्यावेळी बोलताना शिंदे यांनी आगामी निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त करताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. लोकसभेत विरोधकांना चुकून एवढ्या जागा मिळाल्या. पण येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असे शिंदे म्हणाले.
वेड्यावाकड्या आघाड्यांना धडा शिकवा : राज ठाकरे
गेली अनेक वर्षे तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना आणि विशेषतः गेल्या पाच वर्षात वेड्यावाकड्या युती, आघाड्या करून तुमच्या मतांशी प्रतारणा कणाऱ्यांचा विधानसभा निवडणुकीत वचपा काढा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केले.
वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार: पंकजा मुंडे
बीड : लोकसभा निवडणुकीत गडबड झाली; पण ती पुसून टाकायची आहे. आता राज्यात दौरा करणार असून वंचित, दलित, पीडितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेतला जाईल, असा इशारा आ. पंकजा यांनी दिला, दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच धनंजय मुंडे हजर होते.
…तर सरकार उलथवून टाकणार : मनोज जरांगे पाटील
बीड : आचारसंहिता लागायच्या आत जनतेच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, असे आव्हान देत मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी ‘ए सरकार म्हणत दंड थोपटले. या राज्यासाठी झिजणाऱ्यांचा खुन्नस ठेवून अपमान केला तर उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. नारायण गड येथे झालेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक मेळाव्यात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण या सोबतच दलित, मुस्लिम, वंचित, शेतकरी आदी घटकांना न्याय देण्याची मागणी केली. या मेळाव्याला रेकॉर्ड ब्रेक प्रचंड गर्दी जमली होती. दहा दहा किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.
सश
वृत्त संकलन : टीम सकाश