शांतचित्ताने मनाच्या स्वच्छतेची गरज
स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज : देशेसेवेतील योगदानाबद्दल व्यक्तित्वांचा गौरव
कथेदरम्यान हभप नामदेव ढवळे महाराज चारठाणकर यांच्यासह वायुसेनेतील स्क्वाड्रन लीडर आकाश संजय रोडगे यांचे आजी आजोबा पी.एम.रोडगे, सौ.रोडगे, मेजर मंगेश रघुनाथ देशमुख यांचे आई वडील रघुनाथ देशमुख व सौ.देशमुख, संगमेश कैलास मलवडे यांचे आई वडील कैलास व शिवानी मलवडे, तसेच बजरंग टीकमचंद परदेशी यांच्यासह आईवडीलांचा स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
सेलू/परभणी : सर्व जगाचा डेटा आपल्याकडे आहे. पण अंतरंगातील डेटा आपण घालवून बसलो आहोत. सर्व प्रश्न आत्मज्ञानाच्या अभावामुळे निर्माण झालेले आहेत. विचारांचे ओझे माणसाला म्हातारपण देते. राग, द्वेषामुळे तापणारी बुध्दीच्या शितलतेसाठी शांतचित्ताने विचारांची आणि मनाच्या स्वच्छतेची गरज आहे, असे आशीर्वचनपर प्रतिपादन राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयाच्या ‘हनुमानगढ’ परिसरात बिहाणी कुटुंबियांच्या वतीने आयोजित श्रीराम कथेत गुरूवारी (१७ ऑक्टोबर) स्वामीजी बोलत होते. यानिमित्ताने कथा स्थळ व व्यासपीठावर वृंदावनधामचे स्वरूप साकारण्यात आले होते. ‘योगवासिष्ठ’ ग्रंथांतील उपदेश रामकथेच्या तिसऱ्या दिवशी सारांश रुपाने स्वामींजींनी सांगितला. माणसाला अज्ञानाची जाणीव झाली की ज्ञानाचा प्रकाश जीवनात येतो, विचार करणे गरजेचे आहे. विचारांमुळे आत्मज्ञान मिळते. समस्या, प्रश्न कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत. परंतु या कोणत्याही बंधनात अडकवून न राहता, ज्ञान आत्मसात करून मुक्त व्हावे. देश समजून घेण्यासाठी देश चालून पाहाता आला पाहिजे. पिढी घडविण्यासाठी महापुरुषांची चरित्रे सांगितली पाहिजेत, असे स्वामीजी म्हणाले. बुधवारी स्वामीजींनी सांगितले की; कनक, कांता, कीर्ती या तीन गोष्टी तपांचा नाश करतात. काम, क्रोधानेदेखील तपाचा नाश होतो. त्यामुळे सगळ्या सिद्धींचे मूळ केवळ शांतचित्तामध्ये आहे. देहापेक्षा ध्येयाने चालावे. नितीमूल्यांची जपवणूक होऊन संपत्तीची शुद्धी होत असते. अशाच घराण्यात राम जन्माला येऊ शकतात. कथेला श्रोत्यांची मोठी उपस्थिती आहे. दरम्यान, बुधवारी रात्री कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त स्वामीजींच्या उपस्थितीत वर्षा जोशी आणि वैभव पांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.