पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, गंगाखेडातील पत्रकार मेळाव्याला मोठा प्रतिसाद
गंगाखेड : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात पत्रकारांचा एकही प्रश्न मार्गी लावला नाही, अशी खंत व्यक्त करीत, मंजूर झालेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करा. यासंदर्भाने सरकारने सकारात्मक निर्णय तातडीने घ्यावा; अन्यथा येत्या १७ मे रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्याचा इशारा, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिला आहे.
गंगाखेड (जि.परभणी) येथे शुक्रवारी (६ मे) मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या गंगाखेड शाखेतर्फे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यात देशमुख बोलत होते. स्वागताध्यक्ष आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, मुख्य वक्ते पत्रकार विलास बडे, गजानन नाईक, शरद पाबळे, अनिल महाजन, पिराजी कांबळे, परिषदेचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
या वेळी स्व.वसंतराव काणे आदर्श पत्रकार संघ पुरस्काराने नायगाव तालुका (लातूर विभाग), सिल्लोड तालुका (औरंगाबाद विभाग), सावंतवाडी तालुका (कोल्हापूर विभाग), गुहागर तालुका (कोकण विभाग), जामखेड तालुका (नाशिक विभाग), फलटण तालुका ( पुणे विभाग), रिसोड तालुका (अमरावती विभाग), नरखेड तालुका (नागपूर विभाग) या पत्रकार संघांना गौरविण्यात आले.
राजाभाऊ फड, गणेश रोकडे, किसन भोसले, बालासाहेब निरस, ॲड.संतोष मुंडे, विष्णू मुरकुटे, संदीप अळनुरे, तुकाराम मुंडे, विजय जोशी, सुरेश नाईकवाडे, प्रकाश कांबळे, विशाल साळूंके, नंदकुमार महाजन, अनिल वाघमारे आदींसह राज्यभरातील सुमारे सातशे पत्रकारांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन बाळासाहेब राखे यांनी केले. मेळाव्यासाठी गंगाखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पिराजी कांबळे, कार्याध्यक्ष राहुल डोंगरे, बाळासाहेब राखे, अजित स्वामी, गोविंद चौरघडे, राज खाकरे, अंकुश वाघमारे, भागवत जलाले आदींसह संयोजन समितीने परिश्रम घेतले.
सद्यस्थितीत कार्पोरेट पत्रकारिता कशा पद्धतीने सुरु आहे, याबाबत पत्रकार विलास बडे यांनी सविस्तर भूमिका मांडली. अशा स्थितीत तमाम पत्रकारांनी स्वावलंबन आणि स्वाभिमानाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
