श्रीरामकथा : महान आणि चांगल्या विचारांच्या लोकांची संगत ठेवावी
स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन; सेलूतील श्रीराम कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सेलू/परभणी : हलक्या माणसांच्या सोबत चांगली माणसे राहिली, तर ते किती बिघडू शकतात ते बघा. त्यामुळे श्रीराम कधीच हलक्या व दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांत बसत नव्हते. दुष्ट लोकांच्या नादी लागलेली माणसं किती बिघडतात, याच उदाहरण म्हणजे कैकेयीमाता हे होतं. त्यामुळे प्रत्येकाने महान विचारांच्या व चांगल्या विचारांच्या लोकांची संगत ठेवावी, असे आशीर्वचनपर प्रतिपादन राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी शनिवारी, १९ ऑक्टोबररोजी केले.
सेलू येथील नूतन विद्यालयाच्या ‘हनुमानगढ’ परिसरात बिहाणी कुटुंबियांच्या वतीने आयोजित श्रीराम कथेमध्ये स्वामीजी बोलत होते. स्वामीजी म्हणाले, की रामायणातील कैकेयीमाता यांचे श्रीरामावरती अत्यंत प्रेम होते. एवढेच नव्हे तर भगवान श्रीराम व भरत या दोघांनाही समान मानत असत, मात्र दुष्ट प्रवृत्तीच्या दासी मंथरेमुळे त्यांची वृत्ती बदलली. म्हणून संगतीचा दोष असतो. संगतीने चांगल्या माणसाची प्रवृत्ती बदलते, असे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले.
रामाला भरता इतकेच महत्त्व देणाऱ्या कैकेयीमातेने रामाचा राज्याभिषेक सोहळा नाकारून, त्याजागी भरताचा राज्याभिषेक सोहळा आणि रामाला १४ वर्षाचा वनवास हे दोन वर महाराज दशरथ यांच्याकडून घेतले. आणि रामाला १४ वर्षासाठी दंडक अरण्यात वनवासाला पाठवण्याचे काम कैकेयीमाते घडले. त्यामुळे संगत ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. तसेच घरातील मांगल्य टिकून राहण्यासाठी गृहिणींनी सायंकाळी घराबाहेर पडू नये, घरामध्ये दिवे लावावेत. वेशभूषा भारतीय असावी. कपडे, खाणे पिणे, बोलण्याची मर्यादा यामुळेच घरातील मुलांवर देखील चांगले संस्कार होतात. प्राचीन गृह व्यवस्थेमध्ये वाटेल तेथे रडणे नसायचे. यासाठी कोप भवन असायचे. केवळ वादविवाद, भांडण व रडण्यासाठी प्रत्येक घरामध्ये कोपभवन नावाची व्यवस्था उपलब्ध असायची. ज्यांना रडायचे आहे त्यांनी, तेथे जाऊन रडावे. कारण घरात वास्तू देवता कायम वास्तव्यास असते. ती आपण जे बोलतो तसेच व्हावे म्हणते. म्हणून घरामध्ये कायम मंगल बोलावे. मंगल्याचा विचार बोलल्या गेला तर मंगलच होतं. त्या उलट वाईट बोलले गेले की, वाईटच होते. घरात दररोज चांगले बोलत गेल्यास घराचे उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही .कारण शब्दांमध्ये व विचारांमध्ये सामर्थ्य आहे, असे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी आशीर्वाचनपर बोलताना स्पष्ट केले. चांगल्या विचारांची व खानदानी घराण्यातील मुले नौकरांना देखील आदराने वागवतात. माणसांचा विवेक कायम जागृत असला पाहिजे. रघुकुलातील सर्वच माणसं कलंकाला भिणारी होती. आज आपण पाहत आहोत अख्या डांबराने न्हाऊन निघालो तरी, भीत नाहीत. म्हणजेच कलंकाला न भिणाऱ्या युगात आपण जगत आहोत.
♦प्ररेणादायी वीरमातांमुळे भारताचा सुर्वणकाळ
आपल्या मुलांना महानतेची प्रेरणा देणाऱ्या माता या वीरमाता असतात. माझ्या मुलांनी देशासाठी काहीतरी केले पाहिजे ,अशा माता जन्माला येणे गरजेचे आहेत. अशा माता जन्माला आल्या तर भारताला सुवर्णकाळ येईल. प्रत्येकाने तीर्थांच्या मर्यादा राखायला शिकलं पाहिजे. हा शिष्टाचार सदाचार आहे. संस्कृतीचे महत्त्व कळले पाहिजे. दिवसातून देवाला एकदा तरी दंडवत करणे गरजेचे आहे. मोठ्यांनी घरातील छोट्यांना वारंवार चांगल्या गोष्टी सांगत राहणे गरजेचे आहे. कपडे हे अंग झाकण्यासाठी असतात, त्यामुळे महिलांनी शीलवान महिलांचे लक्षण जपली पाहिजेत .
♦आपले वेद जगले पाहिजेत
आपल्या मुलांना प्राचीन इतिहास व आपल्या पूर्वजांचा इतिहास सांगितला तर प्रत्येक घरात मांगल्य नांदू शकते .असेही स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी आशिर्वचनपर बोलताना स्पष्ट केले. द्वारकाधीश यांची म्हणजेच मथुरेची प्रतिकृती व्यासपीठावर सादर करून ही भागवत कथा मथुरेत सुरू असल्याची अनुभूती भाविकांना आली. संयोजकाच्या वतीने देशाचे संरक्षण करणाऱ्या मुलांच्या पालकांचा तसेच वृक्ष संवर्धन करणारे यांचा स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.