भारताने जगाला सर्वश्रेष्ठ विज्ञानाची देणगी दिली
स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज : सेलूतील श्रीरामकथेची आज सांगता, सकाळी दहा वाजता सुरू होणार कथा
सेलू : रामायण, महाभारत ही महाकाव्य त्याकाळी आपली वैज्ञानिक प्रगती कशी होती. हे दाखवणारे ग्रंथ आहेत. शुन्याचा शोध लावून जागाला पुर्णत्व देणाऱ्या भारताने जगाला सर्वश्रेष्ठ विज्ञानाची देणगी दिली. गुणाकार कसा करायचा, वर्गमूळ, घनमुळ कसे काढायचे हे वर्णन’रूद्ररूसा’या ग्रंथात मिळेल. त्यामुळेच आजच्या पिढीला भारतीय प्राचीन वैज्ञानिक प्रगती शिकवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. नूतन विद्यालयाच्या हनुमानगढ परिसरात जयप्रकाश बद्रीनारायणजी बिहाणी कुटुंबियाच्या वतीने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ओजस्वी अमृत वाणीतून सुरू असलेल्या रामकथेचे आठवे पुष्प मंगळवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. बुधवारी, २३ ऑक्टोबर रोजी कथेची सांगता आहे. सकाळी दहा वाजता कथा सुरू होणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
कथास्थळी बारा ज्योतिर्लिंगाचा देखणा मंच उभारण्यात आला होता. पुढे स्वामीजी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. प्रत्येकाच्या अंतःकरणातील शिवाजी महाराज जागले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाही मूल्ये आपल्याला दिली आहेत. ती समतेची शिकवण आपण अनुसरायला हवी. आपण कपडे स्वच्छ आणि असे परिधान करावेत की, आपल्यापेक्षा लहानांना आपला आदर वाटेल. संस्कृती ही आपल्या कपड्यात, वर्तनात, भाषेत दिसते. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी हॉटेलमध्ये जेवण करण्यापेक्षा घरी भोजन करावे. महाराष्ट्र पध्दतीचे भोजन जगात सर्वोत्कृष्ट आहे. असेही ते म्हणाले. कथा श्रवणासाठी महिला -पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सुत्रसंचलन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले.बुधवारी, २३ ऑक्टोबर रोजी कथेची सांगता आहे. सकाळी दहा वाजता कथा सुरू होणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.